उरणमध्ये गुजरात आणि राजस्थानच्या माठांची विक्री सध्या बाजारात उन्हाच्या काहिलीपासून शरीराला गारवा मिळण्यासाठी विविध कंपन्यांचे फ्रिज उपलब्ध असून त्यांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या उन्हात आपल्या कुटुंबाला गार पाणी तरी मिळावे याकरिता गरिबांचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. माठांच्या आकारानुसार शंभर रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत तोटीसह माठ उपलब्ध आहेत. मात्र हे माठ थेट गुजरात व राजस्थानमधून तयार होऊन आलेले आहेत. पृथ्वीच्या उदरात दूषित पाणी गेल्यास ते पुन्हा शुद्ध होऊन जमिनीवर येते. त्याच प्रकारे मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या थंड होते. कृत्रिम फ्रिजच्या थंडगार पाण्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. मात्र ते लवकर व गारेगार असल्याने अशा गार पाण्याचाच अधिक वापर होत आहे. असे असले तरी सध्या बाजारात देशी-विदेशी कंपन्यांचे विविध सोयीसुविधांनी युक्त असे फ्रिज आहेत. ते खरेदी करण्याची ज्या कुटुंबांची ऐपत नाही त्यांना मात्र नैसर्गिक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांचाच आधार आहे. उरण परिसरात अशा प्रकारच्या माठांची विक्री करण्यात येत आहे. दिवसाकाठी आठ ते दहा माठांची विक्री होत असल्याची माहिती राजस्थानमधील माठ विक्रेते राकेश शहा यांनी दिली. तयार माठ राजस्थान तसेच गुजरातमध्येच तयार होऊन विक्रीसाठी येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पूर्वी माठातून पाणी पिण्यासाठी त्यात पेला टाकून पाणी काढावे लागत होते. परंतु सध्या तोटी लावूनच माठांची विक्री केली जात असल्याने माठाचे पाणीही तोटीतूनच मिळत आहे. माठांच्या आकारानुसार शंभर, दीडशे ते १८० रुपयांपर्यंत माठ विकले जात आहेत. या माठांना गावात तसेच काही प्रमाणात शहरातही मागणी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.