केवळ विमानतळ होणार या जाहिरातबाजीने गेली अनेक वर्षे महामुंबई क्षेत्रातील गृहनिर्मितीवर गारुड घालणाऱ्या बांधकाम क्षेत्राला नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाने नवसंजीवनी मिळणार आहे. घरांचे दर दहा टक्क्याने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीनंतरही ही तेजी महामुंबई क्षेत्राला प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे अनेक विकासकांचे मत आहे. आता डिसेंबर २०१९ ला विमानतळावरून पहिले उड्डाण होईल अशी जाहिरातबाजी करून घरांची विक्री केली जाणार आहे.

१६ हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाला रविवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी गेल्या वर्षी दोन हजार कोटी रुपये खर्चाची विमानतळपूर्वे कामांना सुरुवात झालेली आहे. विमानतळाच्या कामांत भराव टाकून सपाटीकरण, त्यावरील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या धावपट्टय़ा आणि कंट्रोल इमारत इतकीचे बांधकाम अपेक्षित असल्याने येत्या २२ महिन्यांत या विमानतळावरून पहिले टेक ऑफ होण्याची शक्यता आहे. यात हे टेक ऑफ मालवाहू की प्रवाशी विमानाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र जेएनपीटी बंदर जवळ असल्याने हे टेक ऑफ मालवाहू विमानांचे प्रथम होणार हे स्पष्ट आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन समारंभाने येथील विकासकांमध्ये एक उत्साह आला आहे. गेली अनेक महिने बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे विकासकात एक मरगळ आली होती. ती या सभारंभामुळे दूर झाली आहे. महामुंबई क्षेत्रात येत्या काळात खूप मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार असून परवडणारी घरे जास्त राहतील. भूमिपूजनामुळे दहा टक्के दरवाढ करण्यास विकासक मोकळे झाले आहेत. नवी मुंबईला चांगले भवितव्य आहे.     – भूपेन शाह, सल्लागार, नवी मुंबई बिल्डर असोशिएशन, नवी मुंबई