|| विकास महाडिक

दसऱ्याच्या मुहूर्तावरील भूमिपूजन कार्यक्रमांची संख्या अर्ध्यावर:- महामुंबई क्षेत्रात दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी ४० ते ५० नवीन गृहप्रकल्पांचे भूमिपूजन केले जात होते. गेल्या वर्षी ही संख्या २४ प्रकल्पांची होती. जागतिक आर्थिक मंदी, सिडकोची महागृहनिर्मिती, निवडणूक काळ यामुळे हा आकडा यंदा अध्र्यावर घसरला आहे. प्रकल्प द्रोणागिरी, पुष्पकनगर या भागाती  मोजक्याच आणि छोटय़ा प्रकल्पांना दसऱ्याला आरंभ झाला.

दसऱ्याला दिवशी ४० ते ५० विकासक हे महामुंबईच्या विविध क्षेत्रांत बांधकामाचा शुभारंभ करीत असल्याचा बिल्डर असोसिएशनच्या कार्यालयाचा अनुभव आहे, मात्र दसऱ्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दहा भूमीपूजनाचेही निमंत्रणे कार्यालयात आली नसल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या शुभारंभाच्या जाहिरतीही मोठय़ा दिमाख्यात प्रसिद्ध झाल्या असून काही मोजके विकासक वगळता अनेक विकासकांनी प्रसिद्धीसाठी हात आखडता घेतला आहे. हाती असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर विकासक भर देत असून त्यातील अनेकांनी ग्राहकांना विविध सवलतींचा वर्षांव केला आहे. तरीही ग्राहक पाठ फिरवीत असल्याचा अनुभव आहे.गेल्या पाच वर्षांत या भागात अनेक गृहसंकुले आकारास आली असून यात २७ हजार घरे ही विक्रीविना पडून आहेत. येथील जमिनींना अधिक मोबदला दिला असल्याने ही घरे ठरवलेल्या किमतीत विकण्याचा विकासकांचा हट्ट आजही कायम आहे. हा घर साठा पडून असतानाच मागील काही महिन्यांत देशात आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या खरेदीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. आर्थिक मंदीच्या या तडाख्यात सिडकोने नेमकी वेळ साधून थेट दोन लाख दहा हजार घरे बांधणार असल्याची घोषणा केली असून त्यातील दहा हजार घरांची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे विकासकांच्या व्यवसायाला आणखीन खीळ बसण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच का?

  •    सर्वसामान्य ग्राहकांनी महामुंबईला पसंती दिली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील गृहप्रकल्पात घर घेणे सोपे आहे, पण त्या ठिकाणी नागरी सुविधांचा नावाने ठणठणाट आहे. यात रेल्वे, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याला जास्त महत्त्व दिले जात असल्याने हार्बर मार्गावरील महामुंबईला ग्राहक पसंती देत आहेत.
  •    नवी मुंबईत माणसी १८० लिटर पाणी देण्याची सोय आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील विकासकांनी महामुंबई क्षेत्रात अनेक परवडणाऱ्या घरांचे दोनशेपेक्षा जास्त प्रकल्प हाती घेतले आहेत.
  •    यात नैना क्षेत्राला जास्त पसंती दिली जात असून या प्रकल्पासाठी जमिनी नैना क्षेत्र घोषित होण्यापूर्वी काही विकासकांनी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे चार वाढीव चटई निर्देशांक अंतर्गत महामुंबई क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या राहात असल्याचे चित्र आहे.

वाहन खरेदीलाही मंदीचा फटका .

दसरा, पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यानिमित्ताने आरटीओ कार्यालयेही नवीन गाडय़ांच्या नोंदणीसाठी सुरू  असतात. परंतु दुचाकी व चारचाकी खरेदीवरही मंदीचे सावट असून गतवर्षी सरासरी ५० नव्या गाडय़ांची दसऱ्याला नोंदणी होत असताना ते प्रमाण कमी झाले असून दसऱ्याच्या दिवशी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फक्त १ नवीन जेसीबीची नोंदणी झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली.