पनवेल, नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ झालेल्या अपघातात अशोक पोश वीर (२८), रेश्मा अशोक वीर (२५) हे पतीपत्नी ठार झाले तर वाशातील अरेंजा कॉर्नरनजीक पहाटे ३च्या सुमारास एका कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी व अन्य दोन किरकोळ जखमी आहेत.

पतीपत्नी दुचाकीवरून जात असताना एलपीजी सिलेंडर भरलेला ट्रक (एमएच ०४ सीए २९३८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. यात हे दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पनवेल ग्रामाीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.

वाशीतील अपघातात कारचालक गंभीर

वाशातील अरेंजा कॉर्नरनजीक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. यात चालक अभिषेक अग्रवाल गंभीर जखमी झाला आहे, अन्य दोन किरकोळ जखमी आहेत.

अभिषेक हा नेरुळ येथील राहणारा असून रात्री मित्रांसमवेत वाशीत आला होता. परतीच्या प्रवासात एका खांब्याला त्याची गाडी नियंत्रण सुटल्याने धडकली. सध्या अभिषेकवर उपचार सुरू असून बेजबाबदारपणे गाडी चालवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.