सीमा भोईर गणेश विसर्जनाचा गैरफायदा घेत नदीत रासायनिक सांडपाणी? कासाडी नदीत अनेक मासे मृतावस्थेत आढळले आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. साधारणपणे गणेश विसर्जनाच्या सुमारास हे सांडपाणी सोडून प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाणी प्रदूषित झाल्याचे भासवले जाते, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या नदीत मासेमारीही केली जाते, मात्र प्रदूषणामुळे मच्छीमारांच्या रोजगारावरही कुऱ्हाड कोसळली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प आहे. तरीही या परिसरात जलप्रदूषण होते. त्यामुळे शेती व भाजीपाला व्यवसाय धोक्यात आला आहे आणि नदीतील मासळीही संपुष्टात येऊ लागली आहे. कासाडी नदीला प्रदूषणामुळे गलिच्छ नाल्याचे रूप आले आहे. मासे मरणे हे नित्याचे झाले आहे, शिवाय नदीतील खेकडे, कटले, चिवणी, सफेद कोळंबी, जिताडा, बोय, पितक, शिवरा या माशांच्या जाती नामशेष होत आहेत, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांत नाराजी आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या कित्येक वर्षांपासून जुनाट व गंजलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या वाहिन्यांतून सांडपाण्याची गळती होते आणि ते सर्वत्र पसरते. त्यामुळे वसाहतीत दरुगधी पसरली आहे. त्याचा परिणाम शेतीवरही होत आहे. जलप्रदूषणाविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात, मात्र तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा जैसे थे होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तळोजा एमआयडीसीतील कारखाने रासायनिक सांडपाणी नदीत सोडतात. गणेश विसर्जनादरम्यान त्याचे प्रमाण वाढते. मासे मृत्युमुखी पडल्याचा परिणाम मच्छीमारांच्या रोजगारावर होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हे सर्व घडत आहे. - अनिरुद्ध पाटील, रहिवासी नदीपात्रात प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे, चौकशी करून दोषी कारखान्यांवर कारवाई केली जाईल. - राहुल मोटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ