राज्यातील पहिल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामाला बेलापूरमधून प्रारंभ नवी मुंबई : पाचशे किलोमीटरचा प्रवास करून मंत्रालयात एखादे निवेदन, अर्ज, तक्रार देण्यासाठी सिंधुदुर्गच्या एका टोकापासून येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आता मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळच बेलापूरमध्ये त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे कोकणस्थांची मुंबईतील वाहतूक कोंडी व मंत्रालयातील द्राविडी प्राणायाम वाचणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेलापूर येथील कोकण भवन येथे सोमवारपासून राज्यातील पहिला मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाला आहे. मुंबईतील मंत्रालयात चांद्यापासून बांद्यापर्यंत हजारो नागरिक दररोज आपल्या तक्रारी, निवेदने आणि अर्ज घेऊन येत असतात. मुख्यमंत्र्यांना अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाचा निपटारा लवकर होतो अशी अपेक्षा या नागरिकांची आहे. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशासाठी अगोदर प्रवेशिका घेण्यातच या सर्वसामान्य अर्जदाराचा अर्धा दिवस जातो. एका दिवसात अर्ज देऊन पुन्हा घराकडे जाणे या अर्जदारांना शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने विभागीय आयुक्तालयात असे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे सर्व विभागीय आयुक्तालयांना आदेश दिले आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्य़ांचे विभागीय आयुक्तालय बेलापूर येथे असल्याने सोमवारी कोकण भवनमधील पहिल्या मजल्यावर उपायुक्त सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत हा सचिवालय कक्ष सुरू झाला आहे. या विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त (महसूल) हे विशेष कार्य अधिकारी राहणार असून त्यांच्यासोबत इतर चार जणांचा कर्मचारी अधिकारी वर्ग राहणार आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून करण्यात आलेले अर्ज, निवेदने, तक्रारी या ठिकाणी स्वीकारल्या जाणार असून ज्या अर्जाची दखल घेऊन त्याची पूर्तता क्षेत्रीय पातळीवर करणे शक्य आहे. ते अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. यासाठी शासनाने एक संगणक प्रणाली विकसित केली असून कोकणातील अनेक रहिवाशांच्या तक्रार अर्जाना कोकण विभागीय आयुक्तालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. या अर्जाचे पुढे काय झाले याचा आढावा एका महिन्यात घेतला जाणार असून तो अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. कोकणातील सर्वसामान्य रहिवाशांना पनवेल येथे रेल्वेने येऊन बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या कोकण भवनमध्ये अर्ज, विनंत्या, तक्रार, निवेदने, देऊन घरी परतणे शक्य होणार आहे. राज्यात कोकणातील रहिवाशांनाच मंत्रालय जवळ आहे. त्यामुळे मंत्रालयात जाऊन मुंबईतील नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन दुसऱ्या दिवशी कोकणात परतण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. कोकणातील जनतेने बेलापूर येथील विभागीय आयुक्तालयाचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर न्याय मिळाला नाही तर अर्जदार हे मंत्रालय गाठत असल्याचे दिसून येते. मंत्रालयात पोहचणे आणि आपली गाऱ्हाणी मांडणे सर्वानाच शक्य होत नाही. ही व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कोकणातील जनतेसाठी बेलापूर येथे सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे. -शिवाजी दौंड, विभागिय आयुक्त, कोकण घणसोलीतून पहिला अर्ज राज्यात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाल्यानंतर नवी मुंबईतील घणसोली गावातून एक पहिला अर्ज आला आहे. जीवन बाळकृष्ण गायकर या सामाजित कार्यकर्त्यांने शहीद भाई कोतवाल यांच्या जीवनावरील चित्रपटाला राज्य शासनाने करमुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.