दिव्यांची मोडतोड; दुरुस्तीनंतर तीनच महिन्यांत पुन्हा ‘जैसे थे’

नेरुळ येथील पामबीच किनारी असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या उद्यानातील दिव्यांच्या खांबांची मोडतोड करण्यात आली आहे. उद्यानात अंधार पसरत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उद्यानातील दिव्यांचे ३५ खांब वर्षभरापासून मोडलेल्या अवस्थेत होते. नोव्हेंबर २०१७मध्ये त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र अल्पावधीतच पुन्हा मोडतोड करण्यात आली. येथील सुरक्षारक्षकांनाही समाजकंटक जुमानत नसल्यामुळे, मोडतोड करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

ज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबईतील एक आकर्षणस्थळ आहे. येथे सकाळी व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची वर्दळ असते. दुपारी आणि सायंकाळी तरुणांची गर्दी असते. नवी मुंबईसह उलवे, ठाणे, मुंबईतूनही येथे पर्यटक येतात. तरुणांचे छायाचित्रणासाठी हे आवडते ठिकाण आहे. उद्यानात १० सुरक्षारक्षक आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबईचा परिसर मोठा असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांना सायकलही देण्यात आल्या आहेत, परंतु सुरक्षारक्षकांनाच दमदाटी करून विजेचे दिवे फोडण्याचे प्रकार घडत आहेत.

येथील दिव्यांचे खांब हे प्लेटवर लावल्यामुळे ते सहज वाकवता येतात. त्यामुळे त्याभोवती मफिंग फाऊंडेशन केले जाण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विजेच्या दिव्यांभोवती तारेचे जीआय मेस गार्ड लावले तर ते तोडता येणार नाहीत, असेही काहींचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही बसवल्यास अशी नासधूस करणाऱ्यांना शोधून काढणे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे शक्य होईल, असे येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांचे म्हणणे आहे.

खांबांची स्थिती

दिव्यांचे एकूण खांब      २३०

मोडतोड केलेले खांब      १८

फीटिंग तोडलेले खांब     ४५

जॉगिंग ट्रॅकवर तरुणांची गर्दी असते. खुली व्यायामशाळाही आहे. आकर्षक प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. येथे नेहमी शांतता असते. अशा सर्व सुविधा असताना येथे मोडतोड करणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. याबाबत पालिकेला पत्रही देण्यात येणार आहे.

– प्रकाश खलाटे, नेरुळ

शहरात पालिकेने अनेक आकर्षक उद्याने व वास्तू उभारल्या आहेत. त्या केवळ पालिकेच्या नसून सर्व नवी मुंबईकरांच्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीच त्यांच्यासाठी केलेल्या सुविधांची काळजी घेतली पाहिजे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मोडतोड करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात येतील.

– मोहन डगावकर, शहर अभियंता