पाणी चोरीकडे दुर्लक्ष; कळंबोलीत समस्या गंभीर

पनवेल : पाताळगंगा नदी आणि हेटवणे धरणातून येणाऱ्या जलवाहिनीतून दिवसाला साडेतीन लाख लिटर पाणीचोरी होत असल्याची धक्कादायक बाब यापूर्वीच समोर आली आहे. असे असले तरी या चोरीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे पनवेल शहर व सिडको नोडला सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कळंबोलीत ही समस्या सध्या गंभीर झाली आहे.

जलवाहिन्या फोडून पाणीचोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही जण हे पाणी व्यावसायिक वापरासाठी वापरत आहेत. उपाहारगृह व बाटलीबंद पाण्यासाठीही ही पाणीचोरी होत आहे. कळंबोली व करंजाडे परिसरात या जलवाहिनी फुटल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फोडून पाणीचोरी करून विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे, कामोठे, नवीन पनवेल (पूर्वे -पश्चिम) जुने पनवेल आणि २९ गावांना सुमारे २९५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे मात्र केवळ २०९ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पनवेल पालिका क्षेत्रात ८६ दशलक्ष लिटर पाणीटंचाई जाणवत आहे. पनवेलमध्ये येणाऱ्या जलवाहिनीतून दररोज ३५ दशलक्ष लिटर अर्थात साडेतीन लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे.

फुटलेल्या जलवाहिनीतून वर्षभर पाणी वाया जात आहे. कळंबोलीत काही भागात दाब कमी असल्याने लोकांना पाणी मिळत नाही. चोरीच्या पाण्यावर धंदे चालतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही.

– आत्माराम कदम, रहिवासी

कळंबोली काळभैरवच्या समोर जलवाहिनी फोडून पाणीचोरी केली जात आहे. वर्ष झाले, यातून पाण्याच अपव्यय होत आहे. आम्हाला मात्र पाणी पाणी करावे लागत आहे.

– सूरज पाटील, रहिवासी

जलवाहिनी फोडून टाकण्याच्या घटना होत नाहीत. त्या जीर्ण झाल्या आहेत.  दुरुस्तीनंतरही गळती होत आहे. त्यामुळे संपूर्ण जलवाहिनी बदलने गरजेचे आहे. लवकरच जलवाहिनी नव्याने टाकण्यात येईल.

– एस. के. दशवरे, उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण