पेटीमागे दीड डझन फळे डागाळलेली; शेतकरी, व्यापारी, ग्राहक हवालदिल ओखी वादळ आणि त्यानंतरचे ढगाळ हवामान याचा मोठा फटका यंदा हापूसला बसला आहे. हापूसच्या दर्जावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात पाडव्यानंतर आंब्यांना मागणी वाढली आहे, परंतु ग्राहकांनी खरेदी केलेल्या हापूसच्या पेटीत बरेच आंबे सडके निघत असल्याने खिशाला झळ बसत आहे. देवगड, रत्नागिरीतील हापूसला त्याच्या अवीट गोडीमुळे मोठी मागणी असते. यंदा लहरी हवामानाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. वाशी बाजारात सध्या ३०ते ३५ हजार पेटय़ा दाखल होत आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात हेच प्रमाण ५० ते ६० हजार पेटय़ा एवढे होते. यंदा सरासरी आवक ३० हजार पेटय़ांनी घटली आहे. बाजारात दाखल होणारे बरेच आंबे परिपक्व होण्याआधीच खराब होत आहेत, असे मत घाऊक फळ व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा ग्राहकांनी खरेदी केलेल्या ४ ते ७ डझन हापूसच्या एका पेटीत सरासरी सुमारे दीड डझन आंबे देठावर काळे पडले आहेत, अशा तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. उत्साहाने खरेदी केलेल्या महागडय़ा पेटीतील बरेच आंबे खराब निघत असल्याने ग्राहक निराश झाले आहेत. हापूस खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याने व्यापारी व शेतकरी हवालदिल झाले आहेत. साधारण १५ एप्रिलनंतर आंब्यांची आवक अधिक प्रमाणात होईल तसेच चांगल्या दर्जाचे आंबे बाजारात येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी खवय्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करणे अपरिहार्य ठरणार आहे. निर्यातीवर २५ टक्के परिणाम आखाती देशांत, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत या ठिकाणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्यांना जास्त प्रमाणात मागणी असते. दरवर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी ५० टक्के हापूसची निर्यात करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण घटून २५ टक्क्यांवर येण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा सुरुवातीला ५ ते १० हजार पेटय़ा हापूसची निर्यात करण्यात आली. परंतु आंबे खराब निघत असल्याने मागणी कमी होत आहे. ती एक हजारांवर आली आहे. आखाती प्रदेशात शारजा, दुबई, सौदी अरेबिया या ठिकाणी सागरी मार्गाने निर्यात होते तसेच लंडन, कुवेतमध्येही निर्यात होते. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी, व्यापारी हवालदिल तर ग्राहक त्रस्त झाले आहेत. आवक घटलीच आहे, परंतु येणारा माल तयार होण्याच्या प्रक्रियेत अधिक खराब होत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. साधारण एप्रिलपर्यंत हीच स्थिती पाहावयास मिळणार आहे. - संजय पिंपळे, आंबा व्यापारी, वाशी बाजार