नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि बा पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. दरम्यान नवी मुंबईत दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात मनसे आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. "ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असातना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत," असं राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे दरम्यान राज ठाकरेंनी शिवरायांचं नाव असावं अशी भूमिका घेण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जर ते विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचं नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं". आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण वादावर दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… "राज ठाकरे बोलल्यानंतर काही जणांनी मागणी केली असं सांगण्यास सुरुवात केली. ही मागणी नव्हती, आधीच हे नाव आहे," असंही यावेळी ते म्हणाले. राज ठाकरेंनी काय भूमिका माडंली आहे “कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असं नाव मिळालं. नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला तेव्हा मला आत्ताचं विमानतळ देशांतर्गत आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार अशी माहिती देण्यात आली होती. ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटतं. हे सध्याच्या देशांतर्गंत विमानतळाचा विस्तारित भाग आहे. हा महाराष्ट्र असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव असेल असं मला वाटतं,” अशी भूमिका राज ठाकरेंनी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली होती. “हे काही सिडकोनं मंजूर केलं नी राज्यानं प्रस्ताव केला असं नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत. (फोटो- नरेंद्र वास्कर) #NaviMumbaiAirport #DibaPatil #Protest pic.twitter.com/zL8PZVAY5H — LoksattaLive (@LoksattaLive) June 24, 2021 “आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलत आहोत या गोष्टींचं भान असायला हवं. जे नाव आहे ते कसं बदलणार?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली होती. “बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं. नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. अडचणी येत असतील तर ते सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. नावात वैगेरे सगळे लोकं गुंतून राहतात म्हणून ते सोयीचं असतं. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं,” असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.