नवी मुंबई : खारघर येथील मोबाइल दुकानाचे शटर वाकवून आतील ५० लाखांचे मोबाइल चोरणाऱ्या तिघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून वाहनचोरीचा गुन्हाही उकल झाला आहे.

शफिकउल्ला ऊर्फ सोनू अतिकउल्ला (वय २४), अयान ऊर्फ निसार ऊर्फ बिट्ट रफी अहमद शेख (वय २८) आणि इम्रान मोहम्मद ऊर्फ इम्मू बिंदू अन्सारी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. तिघेही मूळ बिहार येथील असून घरफोडी आणि वाहन चोरीतील अभिलेखावरील आरोपी आहेत.

३० ऑगस्ट रोजी खारघर येथील शिव इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर गॅस कटरने कापून या तिघंनी दुकानात प्रवेश केला. आतील ५० लाखांचे मोबाइल चोरी केले. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्हीचे डी.व्ही.आर. (ज्यात कॅमेराचे फुटेज जतन केले जाते) यंत्रही तोडून बरोबर घेऊन गेले होते. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्य़ाचा तपास खारघर पोलीस आणि गुन्हे शाखा समांतर करीत होते. आरोपी डी.व्ही.आर.घेऊन गेल्याने पुरावा नव्हता. प्रभारी गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी अशा पद्धतीने चोरी करणारे अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी काढून तांत्रिक तपास सुरू करा अशा सुचना दिल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी मुंबईतील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली असता या तीन आरोपींची माहिती समोर आली. याच माहितीच्या आधारावर तांत्रिक तपास सुरू केल्यावर आरोपी हे धारावी परिसरात लपले असल्याची खबर मिळाली. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. चोरटय़ांनी वापरलेली गाडी कुर्ला येथून चोरलेली निघाली. तिन्ही आरोपींवर एकूण १७ गुन्हे यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत, अशी माहिती आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी दिली.

गुन्हा करताना आरोपी हे दोन-तीन दिवस अगोदर चारचाकी गाडी चोरत. याच गाडीतून एखादे दुकान हेरून त्याची रेकी करीत. त्यानंतर योग्य संधी साधूून चोरी करत असत. गुन्हा करताना कोणीही मोबाइल बाळगत नव्हते.

नेपाळ, बांगलादेशात विक्री

चोरलेले मोबाइल विकत घेणारा एकजण राजस्थानमध्ये असून त्यालाच मोबाइल दिले जात होते. हे मोबाइल नेपाळ, बांगलादेशात पाठवले जात होते. जेणेकरून ईएमआय नंबरवरून मोबाइलचे लोकेशन मिळाले तरी ते परत मिळणे कठीण होत असे.