आर्थिक जुळवाजुळव करण्यास ‘जीव्हीके’ला सहा महिन्यांची मुदत पंधरा हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीव्हीके कंपनीने पदरात पडून घेतले असून वित्त संस्थांकडून आर्थिक जुळवाजुळव करण्यास या कंपनीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरही कंपनीला एखाद्या बँकेकडून अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी आणखी चार-पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतील विमानतळाचे काम जीव्हीके कंपनील मिळाले आले आहे. निविदा प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात टाटा व हिरानंदानी या कंपन्यांनी निविदा दाखल न केल्याने जीव्हीके आणि जीएमआर या दोन कंपन्यांपैकी जीव्हीकेला पहिला नकाराधिकार असल्याने हे काम मिळू शकले आहे. त्यामुळे सिडकोच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया संपुष्टात आली आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हा एक प्रश्न सिडकोच्या समोर असून तो सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. नवीन ठिकाणी बांधकाम खर्च जास्त असल्याने तो वाढवून देण्यात यावा, अशी एक नवीन मागणी पुढे आली आहे. त्याचा निर्णय पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ही निविदा अंतिम मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. त्यानंतर काम मिळालेल्या कंपनीला अर्थपुरवठा करणाऱ्या एखाद्या वित्त संस्थेची मदत घ्यावी लागणार आहे. याच काळात नवी मुंबई विमानतळाचे काम मिळाल्याने कंपनीच्या बाजारातील शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे या कंपनीला एखाद्या वित्त संस्थेकडून अर्थपुरवठा मिळणे सोईस्कर ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेला आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावाधी लोटणार असल्याने विमानतळाचे प्रत्यक्ष काम पावसाळ्यानंतर सुरू होण्याची शक्यता सिडकोच्या सूत्रांनी व्यक्त केली. हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालय आग्रही आहे. जीव्हीकेचे शेअर वधारले नवी मुंबई विमानतळाचे काम मिळाल्याने कंपनीच्या बाजारातील शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे या कंपनीला एखाद्या वित्त संस्थेकडून अर्थपुरवठा मिळणे सोईस्कर ठरणार आहे. तरीही त्यासाठी चार-पाच महिने लगणार असल्यामुळे विमानतळ बांधण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.