संतोष जाधव

करोनाकाळातील गेल्या सात महिन्यांतील एक दिलासादायक चित्र नवी मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. पहिल्यांदाच करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ३७ हजार १८५ जण करोनातून बरे झाले आहेत. आठवडाभरात दोन हजार तीनशे जण करोनाबाधित झाले तर दोन हजार आठशे पन्नास जण बरे होऊन घरी परतले आहेत.

शहरात ४१,३८३ करोनाबधित झाले असून ८३६ जनांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ९० टक्के झाला आहे. आठवडाभरापासून नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले असून करोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. शहरात दररोज ३०० ते ४०० च्या दरम्यान दररोज असलेली करोनाबाधितांची संख्या आता २०० ते ३०० दरम्यान खाली आहे.

नेरुळ व कोपरखैरणे उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. तर शहरात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू ऐरोली व कोपरखैरणे विभागातच झाले आहेत.

काही दिवसांपासून नवे करोनारुग्ण कमी सापडत आहेत, ही शहरासाठी दिलासादायक गोष्ट आहे. असेच प्रमाण सतत राहिले तर लवकरच शहरातील करोनाबाबतचे चित्र आणखी सकारात्मक दिसेल असा विश््वास पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे.

आठवडाभरातील

करोना स्थिती

दिवस   बाधित  करोनामुक्त

७ ऑक्टो.   ३५६    ३०९

८ ऑक्टो.   ३३०    ३३६

९ ऑक्टो.   ३५६ ४३३

१० ऑक्टो  २९६ ३७६

११ ऑक्टो  २७२ ३५०

१२ ऑक्टो  २९४ २६७

१३ ऑक्टो  १८८ ३७८

१४ ऑक्टो  २०८ ४०१

विभागवार आतापर्यंतचे करोनामुक्त रुग्ण

विभाग     करोनामुक्त

नेरुळ-         ६६४०

कोपरखैरणे-     ५७३१

ऐरोली-    ५१०२

बेलापूर-    ५४३७

घणसोली-      ४७०९

तुर्भे-       ४३०६

वाशी-       ४१५७

दिघा-       ११०३

एकूण –    ३७१८५

शहरात अतिदक्षता खाटांची कमतरता जाणवत होती. आता ही संख्या वाढवली आहे. त्यात काही दिवसांपासून अत्यवस्थ रुग्णांची संख्याही कमी होत आहे. डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात २०० अतिदक्षता खाटांची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तर सिडको प्रदर्शनी रुग्णालयात आणखी ७५ खाटा वाढल्यानंतर ताण कमी होईल. खाटांची स्थिती १२ तासांत नोंद करण्यास सांगितले आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका