मराठा संघटनांच्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागल्यानंतर नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारी बंद करण्यात आली. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

मूक मोर्चे शांततेच्या वातावरणात काढून आदर्श घालून देणाऱ्या मराठा संघटनांच्या आंदोलनाला बुधवारी नवी मुंबईत हिंसक वळण लागले. शीव- पनवेल, ठाणे – बेलापूर, पामबीच मार्ग तसेच पनवेलमधील कळंबोली येथे जमावाने जाळपोळ केली. घणसोली, ऐरोलीत रेल रोको करण्यात आले. तर कौपरखैरणेत पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले.

गुरुवारी सकाळपासून नवी मुंबईत शांतता असली तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक भागांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरुन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची शक्यता आहे.