शहरातील स्थानकांत योग्य नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळ रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा विचार केल्यास स्थानके उभारतानाच दाखवण्यात आलेल्या दूरदृष्टीमुळे पुढील किमान २५ वर्षे तरी ही स्थानके वाढत्या गर्दीसाठी पुरेशी ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

सिडको व रेल्वेच्या भागीदारीतून या नियोजनबद्ध स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. एकवीसाव्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे पाहिले जाते. नवी मुंबई १९९२ मध्ये हार्बर रेल्वेने मुंबईशी जोडली गेली. सर्वात प्रथम मानखुर्द ते वाशी रेल्वे सुरू झाली. रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर नवी मुंबई वेगाने विकसित झाली. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, खारघर, मानसरोवर, पनवेलपर्यंत टप्प्याटप्प्याने रेल्वेमार्ग विकसित करण्यात आला. आज नवी मुंबईतून लाखो प्रवासी मुंबईला जातात. त्याचप्रमाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीमार्गे हे शहर ठाणे शहराला जोडले गेले आहे.

स्थानकांचा विकास करताना भविष्यातील वाढती प्रवासीसंख्या विचारात घेण्यात आली होती. मुंबईत रेल्वे मार्गावरील अरुंद पूल व प्रचंड गर्दी याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे नवी मुंबईत विस्तीर्ण फलाट आणि दोन ते तीन भुयारी मार्ग बांधण्यात आले. त्यामुळे एकमेकांच्या बाजूला असलेल्या दोन्ही फलाटांवर गाडी आली तरी प्रशस्त जिन्यांमुळे प्रवाशांचा लोंढा सहज स्थानकाबाहेर पडतो.

विविध स्थानकांमध्ये असलेल्या भुयारी मार्गाची रुंदी मोठी असल्याने दोन्ही दिशेने मोठय़ा संख्येने प्रवाशी एकत्र आले तरी सहजरीत्या त्यांना बाहेर पडता येते. नऊ  डब्यांची रेल्वे १२ डब्यांची झाली तरी नवी मुंबईतील योग्य नियोजनामुळे प्रवासी स्थानकाबाहेर पडण्यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण आली नाही.

स्थानकांतून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी प्रशस्त जागा आहे. त्यामुळे मुंबईतील स्थानकांप्रमाणे येथे प्रवाशांना बस थांबा किंवा रिक्षा थांबा गाठण्यासाठी अडथळा शर्यत पार करावी लागत नाही. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सुटसुटीत आहेत. सीवूड्स हे शहरातील सर्वात मोठे व देखणे स्थानक आहे. नेरुळ-उरण या नव्याने सुरू होणाऱ्या मार्गावरही भागीदारीतून देखणी स्थानके बांधली जाणार आहेत.

७५ ते ८० हजार प्रवासी

नवी मुंबईतील एकटय़ा वाशी स्थानकातून दररोज एक लाख प्रवासी तर नेरुळ स्थानकातून ७५ ते ८० हजार प्रवासी प्रवास करतात. हीच स्थिती सानपाडा, सीवूड्स, बेलापूर, खारघर व ट्रान्सहार्बर मार्गावरही आहे. तरीही गर्दीचे योग्य पद्धतीने नियमन होत आहे.

नवी मुंबई शहरात सिडको व रेल्वेच्या भागीदारीतून आतापर्यंत १४ स्थानके सिडकोने बांधली आहेत. स्थानकांची निर्मिती करताना पुढील ५० वर्षांतील गर्दीचा विचार करण्यात आला आहे. पुढील २५ ते ३० वर्षे ही स्थानके गर्दी पेलवू शकतील.

एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प

नवी मुंबई झपाटय़ाने विकसित झाली ती दळणवळणाच्या साधनांमुळे. नवी मुंबईत सिडकोने सर्वात प्रथम वाशी रेल्वेस्थानकाची निर्मिती केल्यानंतर विविध स्थानके बांधली, परंतु देखण्या स्थानकांबरोबरच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केल्याने आजही लाखो प्रवासी सहजपणे प्रवास करत आहेत.

केशव वरखेडकर, मुख्य अभियंता सिडको, नवी मुंबई

नवी मुंबईतील स्थानके प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहेत. योग्य नियोजनामुळे मोठय़ा गर्दीतही सहजतेने स्थानकातून बाहेर पडता येते. भुयारी मार्ग व प्रशस्त फलाटांमुळे प्रवाशांना मोठय़ा गर्दीतूनही सहज बाहेर जाता येते.

अनिल पवार, प्रवासी

सिडकोने नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची निर्मिती चांगली केल्याने येथील प्रवास सुखकर झाला आहे. दोन्ही आस्थापनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. नवी मुंबईतील स्थानके व तेथील सुविधांसाठी सदैव पाठपुरावा सुरू असतो

राजन विचारे, खासदार

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai real estate railway station cidco harbour railway
First published on: 30-09-2017 at 03:03 IST