बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीचा विरोध; शिवसेनेचा पाठिंबा नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड व्हावी, यासाठी पटलावर ठेवण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करीत बहुमताच्या जोरावर तो नामंजूर केला. स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेची पहिल्या टप्प्यात निवड झाली होती; मात्र महासभेने ‘एसपीव्ही’त केवळ प्रशासकीय अधिकारी असल्याने योजनेत सहभागी होण्यास विरोध केला होता. त्यांनतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाने प्रस्ताव सादर केल्यावर त्यालाही महासभेने मंजूरी दिली नाही; मात्र प्रशासनाने हा नामंजूर प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यावर सरकारने तो निलंबित करून महासभेने याबाबत एका महिन्यात निवेदन द्यावे, असे निर्देश दिले; मात्र महासभेने सदरच्या निवेदनावर कोणताही निर्णय न घेता पुन्हा आयुक्तांकडे पाठविले. त्यानंतर सरकारने आर्थिक वर्षांत नवी मुंबईला स्मार्ट सिटी योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने शुक्रवारी महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन करीत गावठाण झोपडपट्टी आणि कॉलनी भागातील सुविधांच्या सुधारणेसाठी स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले, तर हा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी प्रस्तावाला विरोध करत ‘एसपीव्ही’च्या माध्यमातून काही निर्णय घेतले तरी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकार राहणार असल्याचे स्पष्ट केले. लहान शहरांमध्ये विकासाला पैसा नाही त्याच्यासाठी हा प्रस्ताव योग्य आहे. नवी मुंबईत स्मार्ट सिटीतील सर्व प्रकल्प आहेत. पालिकेच्या पैशांनी शहराचा विकास करायचा आहे. तर बाहेरच्या अधिकांऱ्यानी निर्णय घेण्याऐवजी भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले आहे. त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे शिर्के म्हणाल्या. तर प्रस्तावाच्या बाजूने नगरसेवक रामचंद्र घरत, एम.के.मढवी यांनी मते मांडली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. प्रस्तावावर नगरसेवक अनंत सुतार बोलत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या आयुक्त यांनी हुकुमशाहीची सुपारी घेतली असून हा असंवेदनशील माणूस आहे. यांची डिग्री तपासून बघावी असे म्हणाले. शिकलेला माणुस असे करु शकतच नाही. शहर २० वष्रे मागे गेले आहे. अशी वैयक्तिक टिका केल्यामुळे प्रशासनाच्या वतीने पिटासीन आधिकारी म्हणून असणारे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी वैयक्तिक टिका न करण्याची विनंती केल्यांनतरही नगसेवक अनंत सुतार यांनी टिका सुरुच ठेवली. त्यामुळे अतिरिक्त अंकुश चव्हाण यांनी टिकेच्या निषेधार्थ सभात्याग केला. यावर महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रशासनाने घेतलेली भुमिका लोकशाहीला मारक आहे. लोकप्रतिनिधीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणत प्रशासनाचा निषेध केला. यावर महापौर सुधाकर सोनवणे यांनी विषय मंजुरी ला टाकत राष्ट्रवादी कॉगेसच्या नगरसेवकांनी बहुमतांच्या जोरावर स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला विरोध करत नामंजुर केला. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत जे येत ते शासनाने सांगावे त्यानुसार चांगल्या गोष्टी राबवून शहराचा विकास करू. नवी मुंबई महानगर आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या प्रस्ताव मान्य नाही. शहराचा विकास झाला आहे. पाणी देयक, मालमत्ता कर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेचा फटका येथील नागरिकांना बसेल. सुधाकर सोनवणे, महापौर सत्ताधाऱ्यांना शहराचा विकास नको आहे. स्मार्ट सिटीला केंद्राचा निधी मिळून शहराचा विकास होईल; पण सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला राष्ट्रवादी विरोध करीत आहे. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी विकासाला अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे प्रस्ताव नांमजूर करून घेतला जात आहे. विरोधी पक्ष नेते , विजय चौगुले