१५ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार; महासभेत प्रस्ताव संतोष जाधव, नवी मुंबई कोटय़वधी रुपये खर्च करून सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी उद्यानांसाठी वापरण्याचे महापालिकेने ठरवले असून तसा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शनिवारी होणाऱ्या महासभेत येणार आहे. त्याला मंजुरी मिळाली तर यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोरबेतील पिण्यायोग्य १५ एमएलडी पाण्याची मोठी बचत होणार आहे. शहरात सध्या कौपरखैरणे भागात दोन उद्यानांना हे पाणी दिले जात आहे. या योजनेमुळे नेरुळमधील ३० उद्यानांना ५ एमएलडी पिण्याच्या पाण्याऐवजी नेरुळ सेक्टर ५० येथील मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात ३५५ कोटी रुपये खर्च करून ६ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एसटीपी केंद्रे उभारली आहेत. यातून दररोज सुमारे २२० एमएलडी प्रक्रियायुक्त पाणी तयार केले जाते. पर्यावरण संतुलनाबरोबरच मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी विकून पालिकेला उत्पन्न मिळावे, अशी अपेक्षा होती. परंतु हे ते पाणी समुद्रात सोडण्याची नामुष्की मागील नऊ वर्षांपासून पालिकेवर येत होती. त्यामुळे आता हे पाणी उपयोगात आणण्याचे पालिकेने ठरवले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर उद्याने व दुभाजकामधील सुशोभीकरणासाठी करण्यापेक्षा त्या ठिकाणी मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी देण्याचे ठरविले आहे. याबाबत प्रस्ताव महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. नेरुळ सेक्टर ५० येथील एसटीपी केंद्रातून हे प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. बेलापूर विभागातील महत्त्वाची व मोठी असलेली वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई, आर. आर. पाटील उद्याने या मोठय़ा उद्यानांसह एकूण ३० उद्याने तसेच पामबीच मार्गावरील व शहरातील दुभाजकातील सुशोभीकरणासाठी हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. फक्त नेरुळ विभागातील उद्यानांसाठी मोरबेचे ५ एमएलडी पिण्याचे पाणी वापरले जाते. ते यामुळे वाचणार आहे. शहरात हा प्रयोग राबविल्यास सुमारे १५ एमएलडी पिण्याचे पाणी वाचणार आहे. तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या काळात हे प्रक्रियायुक्त पाणी ‘एनआरआय कॉम्प्लेक्स फेज २’ या सोसायटी सोसायटीला देण्यात येत होते. ६९२ सदनिका व २ हजार लोकवस्ती असलेल्या या सोसायटीत सुरवतीला पिण्याच्या पाण्याचा वापर उद्यानासह गाडय़ा धुणे व इतर साफसफाईसाठी केला जात होता. त्यामुळे या पाण्याचा वापर शहरातील सर्वच उद्यानांसाठी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मलनिस्सारण केंद्रावर वर्षांला १६ कोटींचा खर्च शहरात मलनिस्सारणची नेरुळ, बेलापूर, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली अशी सहा केंद्रे आहेत. वर्षभरात मलनिस्सारण केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येत आहे. हे पाणी सुमद्रात सोडले जात असल्याने उपयोग होत नव्हता. या योजनेद्वारे आता हे पाणी उपयोगात येईल व पिण्याच्या पाण्याचीही बचत होणार आहे. उद्यानांसाठी प्रक्रिया केलेले पाणी देण्यात येईल. त्यातून शहरातील १५ एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर नेरुळसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येत आहे. त्यानंतर शहरात सर्वत्र राबवण्यात येईल. काही सोसायटय़ा व संस्थांचीही हे पाणी देण्याची मागणी आहे. -डॉ. रामास्वामी एन.आयुक्त, नवी मुंबई महापालिका.