नवी मुंबईत सर्वाधिक मृत्यू जुलै महिन्यात

नवी मुंबई : नवी मुंबईत १३ मार्चला करोनाचा शिरकाव होत २३ मार्च रोजी पहिला मृत्यू झाला. त्यानंतर एप्रिलपासून दररोज करोनामुळे मृत्यू होत होते. ‘शून्य मृत्यू’ हे धोरण पालिकेने आखले होते. मात्र

यासाठी दहा महिने प्रतीक्षा करावी लागली असून १२ जानेवारी या दिवशी शहरात करोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.

शहरात आतापर्यंत करोनामुळे १०७० मृत्यू झाले असून जुलै महिन्यात सर्वाधिक २०७ मृत्यू झाले असून दिघ्यात सर्वात कमी ४५ मृत्यू झाले आहेत. ऑक्टोबरनंतर मृत्युदरात घट झाली, मात्र दररोज दोन ते तीन मृत्यू होत होते.

शहरात करोनाबाधितांची संख्या ५१ हजारपार झाली असून रुग्णसंख्या शंभरच्या आत आली आहे. करोनाचा मृत्युदरही आटोक्यात आला असला तरी शहरात दररोजच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात शहरातील मृत्युदर हा ३.२६ होता. त्यात घट होत सद्य:स्थितीत २.०७ इतका झाला आहे. मात्र आतापर्यंत एकही दिवस करोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही असा उजाडला नव्हता. मात्र १२ जानेवारी हा दिवस एकही मृत्यू न झाल्याचा नोंद झाला आहे.

यामुळे महापालिका प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यात सातत्य कसे राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

विभागानुसार मृत्यू

* ऐरोली :      १६९

* कोपरखैरणे : १५८

* नेरुळ :      १५८

* बेलापूर :     १५८

* तुर्भे :       १४९

* घणसोली :    ११६

* वाशी :       ११७

* दिघा :       ४५

* एकूण :              १०७०

मृत्युदर टक्केवारीत

* ९ जूनपर्यंत :  ३. १३

* ९ जुलै :     ३.२६

* ३ ऑगस्ट :   २.६४

* ३ सप्टेंबर :   २.२५

* ३ ऑक्टोबर : २.०५

* ३ नोव्हेंबर : २.०३

* ३ डिसेंबर :   २.०४

* १२ जानेवारी :        २.०७

महिन्यात किती मृत्यू

* मार्च, एप्रिल : ५

* मे : ६८

* जून : १३८

* जुलै : २०७

* ऑगस्ट : १७०

* सप्टेंबर : १६२

* ऑक्टोबर : १५१

* नोव्हेंबर : ८३

* डिसेंबर : ६७

* जानेवारी : १९

शहरासाठी दिलासा

शहरात करोनाच्या नव्या रुग्णांबरोबरच उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. करोना मृत्यू न झालेला दिवस अनेक महिन्यांनंतर उजाडला आहे. मृत्युदरातही घट झाली आहे, हे शहरासाठी अत्यंत दिलासादायक  असल्याचे पालिका आयुक्त -अभिजीत बांगर  यांनी सांगितले.