नवीन कांदा येण्यास मार्च उजाडणार; घाऊक बाजारात कांदा दरवाढ पूनम सकपाळ, लोकसत्ता नवी मुंबई : दरवाढ होत असल्याने केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घातली असली तर पुढील काळात कांदा ग्राहकांना रडवणारच आहे. सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात दहा ते पंधरा रुपयांची दरवाढ झाली आहे. साठवणुकीतील माल खराब आहे. त्यात पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटणार असून बाजारात होणारी आवक कमी होणार आहे. वाशीतील एपीएएमसी बाजारात सोमवारी कांदा दराने १२ ते १५ रुपयांची वाढ झाली. बाजारात नाशिक, ओतूर येथून कांदा मोठय़ा प्रमाणात येत असतो. मात्र पावसाने नवीन उत्पादनच भुईसपाट झाले आहे. ओतूर येथील शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू केली होती, मात्र पावसाने कांदा भिजला आहे. त्यामुळे कांदे खराब झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. कांदा काढणीला आला असतानाच पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नवीन लावलेली कांदा रोपेही भिजली आहेत. ८० टक्के पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकरी प्रकाश चौधरी यांनी सांगितले. कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. जानेवारीमध्ये नवीन कांदा बाजारात येत असतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी लागवड केली होती. मात्र पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकरी परत लागवड करतील मात्र त्यामुळे जानेवारीत येणारा कांदा किमानदेखील भिजून वाया गेली आहेत. त्यामुळे आता शेतकरी परत लागवड करतील मात्र यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यामुळे जानेवारीत येणारा नवीन कांदा येण्यास मार्च उजाडेल असे कांदा उत्पादक शेतकरी चेतन शेटे यांनी सांगितले. या सर्वाचा परिणाम होऊन कांदा दरात पुढील काळात मोठी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पिकासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. त्यात कांदा बियाणेही महागले आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात कांदा पिकवायचा कसा असा प्रश्न आहे. -नितीन तांबे, कांदा उत्पादक शेतकरी, ओतूर