आवक घटू लागल्याने कांद्यांचे भाव वधारले

नवी मुंबई</strong> : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात दहा ते बारा रुपयांनी उसळी घेतली. सर्वसाधारणपणे मुंबईच्या एपीएमसी बाजारात दीडशे ते दोनशे गाडय़ा भरून येणारा कांदा या आठवडय़ात अध्र्यावर आला असून केवळ ८० गाडय़ांमधून पाच हजार ६४५ क्विंटल कांदा घाऊक बाजारात आलेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हा कांदा दहा ते वीस रुपयांनी वधारणार असल्याने ५० ते ६० रुपये कांदा मिळणार आहे. दसरा दिवाळीपर्यंत ही दरवाढ आणखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कांदा मुसळधार पावसाने सडून गेलेला आहे. उरलेल्या कांद्यावर वर्षांचे गणित जमवणाऱ्या कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदीमुळे विस्कटलेले आहे. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपेदेखील तग धरू शकलेले नाही. कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे कांदा यंदा ग्राहकांना रडवणार असे चित्र स्पष्ट होत आहे.

दिल्लीत चाळीस रुपये कांदा वधारल्याने केंद्र सरकारने बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्यावर निर्यात बंदी घातल्याचे स्पष्ट आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या महानगर प्रदेशाला कांदापुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत बुधवारी कांद्याची आवक साडेपाच हजार क्विटलपर्यंत झाल्याने कांद्याचे दर २८ ते ३८ रुपये आहेत. हाच कांदा किरकोळ बाजार ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे.

आवक घटल्याने ही दरवाढ झाली असून येत्या काळात कांदा घाऊक बाजारातच साठ रुपये किलोने विकला जाण्याची शक्यता असल्याचे मत कांदा घाऊक बाजाराचे संचालक अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले.