रेल्वे दुर्घटना होणं ही बाब बऱ्यापैकी रोजचीच झाली आहे. याच आठवड्यात उत्तरप्रदेशात दोन मोठे अपघात घडले. मुंबईतही प्रवासी खांबाला लागून पडत असतात किंवा ट्रेनमधूनही धक्का लागून पडतात. काही जन्माचे जायबंदी होतात तर अनेकांचं आयुष्य संपतं. नवी मुंबईत उघडकीला आलेली घटना मात्र धक्कादायक आहे. निव्वळ पोलीस आणि होमगार्ड यांच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळे एका प्रवाशाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. २१ आणि २२ जुलैचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ज्यामध्ये रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सानपाडा स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून एक प्रवासी अचानक खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर जखमी अवस्थेत तडफडत होता. त्याला उपचारासांठी रूग्णालयात नेण्यात आलं असतं तर त्याचे प्राण वाचू शकले असते, पण या प्रवाशाला वाचविण्याची गोष्टच सोडा, त्याला याच अवस्थेत पोलीस आणि होमगार्ड यांनी तडफडत ठेवलं. रात्रीची वेळ असल्याने आणि पोलीस, होमगार्ड या जखमी माणसाच्या जवळ पोहचल्याने एकही प्रवासी या जखमी माणसाच्या मदतीला धावला नाही. प्लॅटफॉर्मवर असलेल्या पोलीस आणि होमगार्ड यांनी या प्रवाशाला सानापाडा स्टेशनवर नंतर आलेल्या रात्री १ वाजून १५ मिनिटांच्या पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये ढकलून दिलं. पनवेलला जाणारी ही लोकल यार्डमध्ये गेली, दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ जुलैला दुपारी १२ च्या दरम्यान एक कर्मचारी या ट्रेनची स्वच्छता करण्यासाठी एक कर्मचारी आला त्यावेळी त्याला हा तरूण जखमी अवस्थेत आढळला. या कर्मचाऱ्याने या माणसाला आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने तातडीने पनवेल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेबाबत पोलीस आणि होमगार्ड यांनी जी असंवेदनशीलता दाखवली त्यामुळेच या तरूण प्रवाशाचा जीव गेला. याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या होमगार्डला बडतर्फ करण्यात आले आहे आणि पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेकडून मृत प्रवाशाचे नाव जाहीर केलेले नाही, तसेच ज्या पोलिसांनी आणि होमगार्डनी दुर्लक्ष केले त्यांचीही नावे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.