नवी मुंबई : कौटुंबिक वादातून एका निवृत्त पोलीस हवालदाराने दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. भगवान पाटील असे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी भगवान पाटील हा ऐरोलीत पत्नी आणि मुलासोबत राहत असून निवृत्त पोलीस हवालदार आहे. त्याची वागणूक विक्षिप्त होती. यालाच कंटाळून सुजय आणि विजय ही दोन्ही मुले त्यांच्या कुटुंबीयांसमवेत वेगळी राहतात. सोमवारी आरोपीने दोन्ही मुलांना भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले होते. यावेळी वाहनाच्या इन्शुरन्सवरून त्यांच्यात वाद झाला. यातून आरोपीने स्वत:कडील बंदूक काढून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विजय याच्या दंडाला चाटून गेली तर दुसरी त्याच्या पोटात लागली. तिसरी गोळी सुजय याच्या दंडाला चाटून गेली. यात विजय याचा मृत्यू झाला असून सुजय याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला रबाळे पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली असून मंगळवारी न्यायालयाने त्याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.