बेलापूर सेक्टर १५ मध्ये रस्त्यालगतच्या झाडांचे केवळ बुंधे शिल्लक; महापालिका मात्र अनभिज्ञ वाहतुकीच्या आड येणाऱ्या किंवा धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे हे पालिकेचे काम असले, तरी प्रत्यक्षात मात्र पालिका छाटणीच्या नावाखाली वृक्षतोड करत असल्याचा आरोप बेलापूरमधील रहिवाशांनी केला आहे. बेलापूर सेक्टर १५ येथील साई विहार सोसायटीच्या परिसरात बुधवारी मोठय़ा प्रमाणात विनापरवाना छाटणी करण्यात आली आहे. छाटणीच्या नावाखाली जवळपास सर्वच फांद्या तोडून केवळ बुंधाच शिल्लक ठेवण्यात आला आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवी मुंबई शहरात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी पालिका करते; परंतु अनेक वेळा विनापरवाना छाटणी केली जात असून पालिकेच्या उद्यान विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे बेलापूर सेक्टर १५ येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. झाडांच्या मागे असलेल्या दुकानांच्या नावांचे फलक झाकले जाऊ नयेत म्हणून फांद्यांची छाटणी करण्यात आल्याचा संशयही रहिवाशांनी व्यक्त केला आहे. झाडांचा केवळ बुंधाच शिल्लक ठेवण्यात आल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. छाटणी करणाऱ्या कामगारांना विचारले असता त्यांनी तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. झाडे तोडली जात असताना उद्यान अधिकारी काय करतात, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता, चुकीच्या पद्धतीने व विनापरवाना छाटणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गाळ्यांच्या फलकांसाठी छाटणी? शहरात मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक गाळे आहेत.पदपथावरच असलेल्या वृक्षांमुळे दुकानांचे फलक न दिसल्यामुळे व नीटशी जाहीरात होत नसल्यामुळे अनेकवेळा विनापरवाना छाटणी केली जाते. प्रदूषण वाढत आहे. पालिका हद्दीत मोठी झालेली झाडे छाटण्यात येत आहेत. विनापरवाना छाटणी केली जात आहे. एक झाड वाढवण्यासाठी किती तरी वर्षे लागतात आणि छाटणी करताना बेदरकारपणे सर्व फांद्या तोडल्या जात आहेत. कामगारांना अडवले असता किंवा चौकशी केली असता ते पळून जातात. पालिकेने याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. - छाया खाडे, बेलापूर चौकट वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करताना झाडाच्या मूळ खोडाला इजा होऊ नये तसेच शेंडा तोडू नये असा नियम आहे. तसेच ज्या झाडावर पक्ष्यांचे घरटे असेल ते घरटे तोडू नये असे असताना अनेक वेळा शहरात विनापरवाना फांद्यांची छाटणी होते. त्याच्यावर पालिकेचा अंकुश हवा. बेकायेशीशरपणे छाटणी करणारांवर कारवाई व्हायला हवीच. आबा रणावरे, वृक्षमित्र शहरात विनापरवाना छाटणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. महापालिकेतर्फेही फांद्यांची छाटणी केली जात असताना दुसरीकडे सोसायटय़ांनाही फांद्या छाटणीची परवानगी दिली जाते. चुकीच्या कामाबाबत येग्य ती खबरदारी घेण्यात येईल. तुषार पवार, उपायुक्त, उद्यन विभाग