मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताची नोंद घेत सरकारचे मंत्री धावू लागले असून उरण परिसरातही अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत. याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी उरण पनवेल महामार्गावरील गव्हाण फाटय़ावर एकामागून एक सहा अपघातांत झाली. या वेळी कंटेनर व रिक्षाच्या झालेल्या अपघातात गुलाब कातकरी (२७) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वेळी चिरनेर, उरण-पनवेल गव्हाण येथे एकूण आठ वाहनांची एकमेकांनी धडक दिल्याने अपघात झाला आहे.
उरण पनवेल व पनवेल चिरनेर या रस्त्यांना जोडणाऱ्या गव्हाण फाटय़ावर एका मातीच्या डंपरने एटरीका कारला धडक दिली तर डंपरला कंटेनरने धडक दिली असा तिहेरी अपघात घडला. त्यामुळे कार दरीत कळवंडली होती. प्रसंगावधान ओळखून वाहनांतील प्रवाशांनी एकमेकाचा आधार घेत कसाबसा आपला जीव वाचविला यामध्ये नारायण जाजला, अश्विनी जाजला, निकिता, अवंतिका, विनीत व गीता हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिरनेर रस्त्यावर रिक्षाला कंटेनरने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कारमधील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीच्या परिणामी एकामागोमाग सहा वाहनांची एकमेकांना धकड दिल्याने दुसरा अपघात झाला आहे. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2016 3:11 am