नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसविरोधात नवी मुंबई आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, ऐरोलीतील एका स्कूल बसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमाला फाटा देऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र शासनाने कठोर नियम आखून दिले आहेत. यात वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, विमा, सुरक्षात्मक उपाय आदींची पूर्तता करणे या बसचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र काही बसचालकांकडून आजही हे नियम पाळले जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर आरटीओने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही झाडाझडती सुरू केली आहे.