महात्मा गांधीनी दिलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उरणच्या चिरनेर परिसरातील सर्वसामान्यांनी सहभाग घेऊन २५ सप्टेंबर १९३० ला जंगल सत्याग्रह केला. यावेळी ब्रिटीश सरकारच्या पोलीसांनी केलेल्या गोळीबारात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या ८८ व्या स्मृतीदिनी चिरनेर येथील स्मारकात शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेतेही मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हुतात्म्यांच्या वारसांना सन्मानित करण्यात आले. तर हे वर्ष निवडणूकांचे वर्ष असल्याने नेत्यांची संख्या लक्षणिय होती. चिरनेर जंगल सत्याग्रह हा येथील आक्कादेवीच्या माळरानावर झाला. यात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी-चिरनेर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी- कोप्रोली, रामा बामा कोळी-मोठीजुई, आनंदा माया पाटील- धाकटीजुई, परशुराम रामा पाटील-पाणदिवे, हसुराम बुधाजी घरत- खोपटे व आलू बेमटय़ा म्हात्रे- दिघोडे यांनी या स्वातंत्र्य लढय़ात आपले बलीदान दिले. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी ब्रिटीश काळातच चिरनेर येथे स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे. या स्मारकाला दरवर्षी पोलीसांकडून बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली जाते. त्यानंतर चिरनेर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे आमदार जयंत पाटील हे होते. नेत्यांची उपस्थिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर,माजी आमदार विवेक पाटील, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी माळरानावर वनवासी आश्रमाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आदीवासी हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मृती जागविण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील शेकडो आदीवासींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी हे उपस्थित होते.