पनवेल येथील इंडियाबुल्स विलगीकरण कक्षात २२ दिवसांपासून असणाऱ्या नवी मुंबईतील करोना संशयित रुग्णांचा संताप शनिवारी उफाळून आला. या कक्षातील संशयित रुग्णांनी थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच घेराव घालून जाब विचारला. करोनाच्या संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल २२ दिवसांनंतरही दिला नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. डॉक्टरांशी बोलल्याशिवाय आपण विलगीकरणातून हलणार नाही असा पवित्रा यश केंद्रातील संशयित रुग्णांनी घेतला. या केंद्रातील संशयित रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून त्यांचे हाल होत असल्याचे सांगण्यात येते. पनवेल येथील इंडिया बुल्स विलगीकरण केद्रांत ५०० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आणि संशयित रुग्ण आहेत. या इमारतीमधील केंद्र ५ मधील रुग्ण संतप्त होऊ न बाहेर पडले. त्यांनी समोर घनकचरा विभागाचे अधिकारी दिसल्यावर त्यांना जाब विचारला. मात्र हे अधिकारी सफाई कामकाज बघण्यास गेले असल्याने त्यांनी डॉक्टर येईपर्यंत थांबण्याची विनंती त्यांना केली. मात्र रुग्णांनी आक्रमक पवित्रा घेऊन ठिय्या दिला.

रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात गैरसमाजातून वाद झाले होते. तीन चाचण्याचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याशिवाय घरी सोडता येत नसल्याने उशीर होत आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका