सीमा भोईर, पनवेल पनवेल शहरात फेब्रुवारी सरताच पाणीटंचाई भेडसावू लागत असताना या शहरात विहिरींच्या स्वरूपात असलेल्या भूजल साठय़ाकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पनवेलची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून त्यामुळे गाढेश्वर धरणाचा पाणीसाठा अपुरा ठरत आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीकडून पाणी मिळवावे लागते. या जलस्रोतांखेरीज शहरात विहिरींची संख्याही मोठी आहे. त्यांचे योग्य संवर्धन करण्यात यावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. पनवेलमध्ये पूर्वी वाडे होते आणि त्या वाडय़ांमध्ये विहिरी होत्या. आता या वाडय़ांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत आहे. मात्र शहरीकरणाच्या रेटय़ात काही विहिरी बुजल्या आहेत. देखभाल, दुरुस्ती आणि सफाईअभावी काही विहिरींतील पाणी अस्वच्छ झाले आहे. पालिका क्षेत्रात सुमारे १८२ विहिरी आणि सुमारे १७०० कूपनलिका आहेत. गाढेश्वर धरणाची साठवणूक क्षमता ३.५७ एमसीएम आहे. मात्र पनवेल शहराला रोज २६ ते २८ दशलक्ष लिटर पाणी लागते. देहरंग धरणातून रोज सुमारे १२ दशलक्ष लिटर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सात दशलक्ष लिटर व सिडकोकडून ०.५०दशलक्ष लिटर असा एकूण २६.५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा शहराला होतो. पावसाळ्यात गाढेश्वर धरणाचे पाणी शहरवासीयांना पुरते, मात्र फेब्रुवारीपासून स्थिती गंभीर होऊ लागते. दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. काही वेळा दोन दिवसांनीही पाणी येत नाही. पाण्याचे प्रमाण अपुरे आणि वेळा अनिश्चित असतात. शहरात दांडेकर वाडा, कनक हरि सोसायटी, पूर्वीचा खरे वाडा आणि आताची सुवर्णपुष्प सोसायटी, बापटवाडा, विरुपाक्ष मंदिर, प्रथमेश अपार्टमेंट, मुस्लीम मोहल्ला, पूर्वीचा शेडगेंचा वाडा, आता यशोअनंत सोसायटी, सुवर्णपुष्प इमारत, यशो कृष्ण सोसायटी, अशोका गार्डन्स, कुंभारवाडा, धोबी आळी या ठिकाणी विहिरी आहेत. त्यातील पाण्याचा वापर रहिवासी कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी करतात. अनेक विहिरींचा परिसर अस्वच्छ आहे. लोखंडी पाडय़ातील विहीर, दांडेकर वाडय़ासमोरील रस्त्यालगतची विहीर अखेरच्या घटका मोजत आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विहिरी आहेत. त्यांचा वापर होत आहे. अनेक सोसायटय़ा त्यांच्या आवारातील विहिरींचे पाणी वापरतात. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये कचरा, प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या टाकलेल्या आढळतात. सर्वत्र डांबरीकरण व काँक्रीटीकरण झाल्यामुळे तसेच वृक्षांची कत्तल झाल्याने भूजल पातळीत रोडावू लागली आहे. या विहिरींची योग्य निगा राखली गेल्यास, त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतल्यास, शहराला पाणीटंचाईच्या काळात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पनवेल क्षेत्रातील विहिरी असोत वा तलाव सर्वच जलस्रोतांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, त्यासाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील राहील. - गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका दर उन्हाळ्यात पनवेलकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पनवेलमधील विहिरींचे संवर्धन केले तर त्यांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी झाला नाही तरी अन्य कारणांसाठी केला जाऊ शकतो. - वसंत म्हात्रे, रहिवासी पनवेल.