पोलीस आयुक्तांच्या विधानाने गणेशभक्त संभ्रमात
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे न्यायालयाचा वटहुकूम मानण्यास तयार नाहीत. या मंडळांना कायद्याचे व सामाजिक भान आणण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देशावर गणेशोत्सवादरम्यान अतिरेकी हल्ला होण्याचे संकेत मिळाल्याची माहिती जाहीर करून जनतेला धार्मिक एकोपा जपण्याचा सल्ला दिला.
देश अतिरेकी संकटात असून नागरिकांनी एकत्रित या संकटाला तोंड देण्याचे भावनिक आवाहन आयुक्त रंजन यांनी गणेशभक्तांना केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करा, अशा सूचनावजा कारवाईचा इशारा मंडळांच्या प्रतिनिधींना यावेळी दिला. नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या २०१४ विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम पनवेल येथील फडके नाटय़गृहात शुक्रवारी सायंकाळी झाला. नवी मुंबईमध्ये पाचशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे रस्ता रोखून गणेशोत्सव साजरा करतात. आयुक्त रंजन यांनी अचानक केलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विधानामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमात उपस्थित पोलिसांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांनी यावेळी गणेशभक्तांना रस्ते अडविण्याऐवजी जवळच्या मैदानात परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करा, अशी विनंती केली आहे.