डिसेंबपर्यंत लोकल धावण्याची शक्यता उरण तालुका आणि जेएनपीटी बंदरासाठी वरदान ठरणाऱ्या नेरुळ उरण रेल्वे मार्गाची नुकतीच एलएमव्ही रेल्वे कारने चाचणी करण्यात आली. नेरुळपासून साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या खारकोपपर्यंत ही चाचणी यशस्वी झाल्याने येत्या डिसेंबपर्यंत या मार्गावर लोकल धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गात पाच रेल्वे स्थानके आहेत. जुलै १९९७ पासून कागदावर असलेल्या या मार्गाच्या कामाला जून २०११ नंतर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या महिन्यात खारकोपपर्यंतचा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार होता; मात्र त्याला आणखी पाच महिने लागणार आहेत. रेल्वे आणि सिडको यांनी मानखुर्द ते वाशी दरम्यानचा रेल्वेमार्ग मे १९९२मध्ये पूर्ण केला. एखाद्या महामंडळाने आर्थिक भार उचलून पूर्ण केलेला हा देशातील पहिला प्रकल्प ठरला. त्यानंतर हा मार्ग पुढे टप्प्याटप्प्याने पनवेलपर्यंत नेण्यात आला. केवळ मालगाडीसाठी असलेल्या दिवा ते तुर्भे रेल्वे मार्गाचे प्रवासी मार्गात रूपांतर करून ठाणे ते तुर्भे हा रेल्वे मार्ग नोव्हेंबर २००४ ला सुरू करण्यात आला. नवी मुंबईतील पाच रेल्वे प्रकल्पांत जुलै १९९२मध्ये नेरुळ व उरण या २७ किलोमीटर मार्गाचा आराखडा मांडण्यात आला होता. सामंजस्य करार २०११ मध्ये पूर्ण झाल्यानंतर नेरुळ-उरण या मार्गाचे काम सुरू झाले. मार्गात चार खाडीपूल व पाच उड्डाणपुलांचा समावेश आहे. मार्गाला खारकोपरनंतर उरणपर्यंत जमीन संपादन आणि खारफुटीचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे २० किलोमीटरच्या मार्गाचे काम थांबले आहे. सुमारे ४०० एकर जमीन या मार्गासाठी संपादित करावी लागणार असून येथील शेतकऱ्यांची आता साडेबावीस टक्के योजनेतील (जे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले आहेत) भूखंडांची मागणी आहे. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळे पॅकेज सिडकोला तयार करावे लागणार आहे. यात बराच कालावधी जाण्याची शक्यता असल्याने प्रकल्प खारकोपर नंतर रखडण्याची शक्यता आहे. उरणचे औद्योगिक महत्त्व लक्षात घेता सिडको व रेल्वेने किमान खारकोपपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच महिन्यांत ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. याचा एक भाग म्हणून नुकत्याच या साडेसात किलोमीटरच्या रेल्वे रुळांची लोकोमीटर कारने चाचणी पूर्ण करण्यात आली. हा मार्ग खाडीकिनारी भराव टाकून उभारण्यात आल्याने पुढील काही महिने ही चाचणी वारंवार केली जाणार आहे. नवी मुंबईतील रेल्वे प्रकल्पात सिडकोचा ६७ टक्के वाटा आहे. त्यामुळे अनेक स्थापत्य कामे सिडकोच्या वतीने केली जात आहेत. नेरुळ-उरण मार्गावरील उड्डाणपूल व खाडीपुलांची कामे झाली आहेत. सध्या रूळ तपासणी सुरू असून येत्या पाच महिन्यांत या मार्गावर खारकोपपर्यंत लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. - डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको