उड्डाणपुलाखालील जागा मोकळ्या ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही नवी मुंबईतील पुलांखाली बेकायदा आसरा घेतलेला दिसतो. उरण फाटा ते पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या आम्रमार्गावरील उड्डाणपुलाखालीही भंगारची दुकाने, झोपडय़ा तसेच बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. सानपाडा रेल्वेस्थानकाबाहेरील महामार्गावरील उड्डाणपूल भिकाऱ्यांचे व गर्दुल्लय़ांचे आश्रयस्थान बनले आहे. तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाखालीही बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळत आहे. तर रात्रीच्या वेळी तात्पुरत्या ‘खाऊ गल्लय़ा’ सुरू असतात. उरण फाटा येथील पुलाखाली भंगारची दुकाने थाटलीआहेत. झोपडय़ा बांधल्या असून वाहनांचे बेकायदा पार्किंग केले जात आहे. आम्रमार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या बेकायदा झोपडय़ा तसेच भंगार दुकाने व बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी सांगितले.