२०१७ मध्ये नवी मुंबई पोलिसांकडून शेवटचा छापा

ठरावीक कालावधीत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळ्यांच्या कारवाया २०१६ पासून बंद असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. बनावट नोटांप्रकरणी एखादा अपवाद वगळता शहरात आजवर मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. तसा एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नवी मुंबईत सप्टेंबर २०१७ मध्ये महसूल विभागाने केलेल्या कारवाईत सात लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर अशी एकाही घटनेची नोंद पोलीस दफ्तरी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबईत सर्वाधिक बनावट नोटांचे जाळे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) होते. बाजार समितीत रोज कोटय़वधी रुपयांचे रोखीचे व्यवहार आजही चालतात. त्यामुळे बनावट नोटा खपविण्याचे एकमेव ठिकाण म्हणून अनेक टोळ्या सक्रिय होत्या. बनावट नोटांबाबत पोलिसांनी सर्वाधिक कारवाया या ‘एपीएमसी’मध्ये केल्या आहेत. यातील बहुतांश आरोपी हे भारत आणि बांगलादेश सीमेवरील गावातील असल्याचे अनेकदा तपासात समोर आले.

पाकिस्तानात बनावट नोटा छापल्या जात होत्या, मात्र भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा कडक आणि नेपाळसह भारताशेजारील अन्य राष्ट्रांचा अशा गैरकृत्यात स्थानिक नागरिकांचा  असहकार असल्याने यासाठी बांगलादेशातील बेरोजगारांना वापरून बांगलादेश मार्गे नोटा पाठवल्या गेल्याचे अनेकदा समोर आले आहे.

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळ्यांचा माग नेहमीच काढला जातो. त्यात त्या सापडतात, परंतु अशा नोटा बँकेत आढळून येतात, मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय एका व्यवहारात पाचहून अधिक बनावट नोटा आढळून आल्या तरच गुन्हा दाखल होतो, अन्यथा त्या नोटा नष्ट केल्या जातात, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या अनेक टोळ्यांवर ठोस कारवाई करीत आरोपींचा सातत्याने माग काढला जातो. यात अनेक टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. काही वर्षांपासून बनावट नोटांप्रकरणी एकही गुन्ह्य़ाची नोंद झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. -अजय कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>