नवी मुंबई : टाळेबंदीत जास्त काळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने अनेक आजार जडलेल्या माथेरानमधील ३५० घोडय़ांची मंगळवारी चिकित्सा करण्यात आली. या घोडय़ांना अडीच महिने तबेल्यातच उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांना अपचनाचा त्रास सहन करावा लागला. याशिवाय काही घोडय़ांना गुडघेदुखी झाली. रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेतलेल्या एका शिबिरात घोडय़ांची चिकित्सा करण्यात आली. या वेळी आजारी घोडय़ांना धनुर्वाताची लस देण्यात आली. याशिवाय सामाजिक अंतर राखत त्यांना काही अंतर फिरवून आणण्याच्या सूचना करण्यात आल्या. या वेळी १४ पाळीव श्वान आणि तीन मांजरांचीही तपासणी करण्यात आली. घोडय़ांवर पर्यटन व्यवसाय अवलंबून असणारे माथेरान हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. येथे ४६० प्रवासी आणि सुमारे २०० मालवाहतूक घोडे आहेत. २५ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे या घोडय़ांची आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २३५ कुटुंबांची वाताहत झाली. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण राजपूत यांच्या प्रयत्नाने पशुवैद्यकीय केंद्रात घोडय़ांची चिकित्सा करण्यात आली.