साडेचार हजार झाडांचे पुनरेपण शक्य; वृक्षसंवर्धनसाठी ‘बिहार पॅटर्न’ राबविणार मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या पाचव्या टप्प्यात सुमारे ३१ हजार झाडांचा बळी जाणार आहे. यातील साडेचार हजार झाडांचे पुनरेपण करणे शक्य आहे. यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार आहे. ही झाडे रत्नाागिरी जिल्ह्य़ात आहेत. या मार्गाचे काम या महिन्यात सुरू होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरणात हजारो झाडांची कत्तल झाली होती. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबई-पुणे महामार्गाप्रमाणे ३६६ किलोमीटरच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली सात वर्षे सुरू आहे. यातील पनवेल ते इंदापूर या मार्गातील काम काही अंशी झाले आहे. यापुढे टप्पा क्रमांक सहा व सातचे काम या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्य़ातील संगमेश्वर व लांजा तालुक्यातील ९१ किलोमीटरच्या मार्गालगत ३१ हजार वृक्ष हटवावे लागणार आहेत. यात संगमेश्वर तालुक्यातील १२ हजार ४७८ व लांजा तालुक्यात १८ हजार ४२४ झाडे आहेत. अकरा हजार ७३५ कोटींच्या या प्रकल्पातील जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला अडसर ठरू पाहणाऱ्या चार हजार ५३६ वृक्षांचे इतरत्र पुनरेपण केले जाणार आहे. या महामार्गालगत नवीन वृक्षारोपण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग बिहार पॅटर्न राबवणार आहे. मार्गालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना ५० झाडांची लागवड आणि संवर्धन अशी दुहेरी जबाबदारी दिली जाणार आहे. ही ५० झाडे जगल्यानंतर तीन वर्षांनी या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे वृक्षतोडीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसानदेखील भरून काढता येण्यासारखे आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे या मार्गाच्या चार पदरी रुंदीकरणासाठी आग्रही असून त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सादरीकरण केले आहे.