दोन ते तीन महिने दुरुस्तीसाठी लागणार लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठिकाणी मतदान शाबूत राहण्याची काळजी घेतल्याने मतदार यादीत घोळ काही हजारांच्या घरात गेले आहेत. मतदार यादीतील या घोळामुळे पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे एक प्रमुख कारण ठरणार आहे. मागील महिन्यात पालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात बोगस मतदारांचा पाऊस पडला असून ही संख्या दहा हजारांच्या घरात आहे. काही मतदारांची नावे गायब असून दुसऱ्या मतदारसंघात जोडण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार यादीतील हा घोळ पालिकेला निस्तारण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवी मुंबईत माथाडी कामगारांची संख्या सत्तर ते पंचाहत्तर हजाराच्या घरात आहे. त्यांचे कुटुंब धरून ही मतदारसंख्या एक लाखाच्या वर जात असून पश्चिम महाराष्ट्रातील हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार मानला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नवी मुंबईत व पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात असा दुहेरी मतदान करण्याचा सल्ला मतदारांना दिला होता. त्यावरून पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीसदेखील आली होती. पवार यांच्या सल्ल्याची तंतोतत अंमलबजावणी नवी मुंबईतील मतदार करीत असून पालिका निवडणुकीसाठी याच ठिकाणी मतदान राहावे आणि त्याच वेळी ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी गावात मतदान कायम राहावे यासाठी हे मतदार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे येथील मतदारांची दुबार पेरणी होत असल्याचे दिसून आले आहे. मतदार नोंदणीसाठी येणारे शासकीय अधिकारी येथील मतदार नोंदणीसाठी फारसे गंभीर नसल्याने झोपडपट्टी व शहरी भागातील इमारती चाळींची स्पष्ट नावे नोंद केली जात नाही. त्याचा फायदा बोगस मतदार उचलत असल्याचे दिसून येते.