वेगवान वाहतुकीला चालना; बंदर परिसरालाही प्राधान्य
जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते पळस्पे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व जेएनपीटी ते पामबीच (नवी मुंबई)या दोन्ही महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरण करण्यात आलेले असून पळस्पे ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बचा क्रमांक बदलून तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ तर जेएनपीटी ते पामबीच (नवी मुंबई) दरम्यानच्या राज्य महामार्ग क्रमांक ५४ या रस्त्याचे ३४८ अ राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करण्यात करण्यात आले आहे.त्यामुळे जेएनपीटी व उरणला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतरण करण्यात आल्याची माहीती राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने दिली आहे.त्यामुळे यापूढे उरण तालुका हा राष्ट्रीय महामार्गाचा तालुका बनला आहे.
उरण तालुक्यात येणाऱ्या व जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या रस्त्याचे सहा व आठ पदरी रस्त्यात रूपांतरण करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्रालयाने घेतला आहे.या कामाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आले आहे.या दोन्ही रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाला व रस्त्यावरील उड्डाण पुलांच्या कामांना १५ मे पासून सुरूवात करण्यात आली आहे.
या दोन्ही रस्त्याच्या रूंदीकरणात जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते गव्हाण फाटा या दोन्ही रस्त्याचे रूंदीकरण चार पदरी ऐवजी सहा पदरी तर जेएनपीटी ते गव्हाण दरम्यानच्या जून्या राज्य महामार्गाचे रूपातरण सहा पदरी रस्त्यात करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे गव्हाण फाटा ते पळस्पे व गव्हाण फाटा ते पामबीच(नवी मुंबई) मार्गाचे आठ पदरी रस्त्यात रूपांतरण करण्यात येणार आहे.
यामध्ये डी पॉइंट कळंबोली ते सायन पनवेल महामार्गाचेही रूपांतरण राष्ट्रीय महामार्गात करण्यात आलेले आहे. या मार्गाला नव्याने ५४८ क्रमांक देण्यात आला आहे.
या तीनही मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेडगे यांनी दिली. तसेच जेएनपीटीला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे उरण, पनवेल व नवी मुंबई तसेच मुंबई गोवा मार्गावरील वाहनांना मोठे रस्ते उपलब्ध होणार आहेत.

रुंदीकरणास सुरुवात
जेएनपीटी बंदरातील वाढत्या आयात निर्यातीच्या व्यवसायामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढू लागल्याने बंदर व बंदराला जोडणाऱ्या परिसरातील रस्ते रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विभागाने हाती घेतले आहे.