नवी मुंबईतील तळोजा वसाहतीमधील रेल्वे क्रोसिंग खालून वाहनांची येजा करण्यासाठी ६० कोटी रुपये खर्च करुन बांधलेला भुयारीमार्ग मागील दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची येजा करण्यासाठी गैरसोय होत आहे. मागील वर्षी हा भुयारी मार्ग खुला करण्यात आला होता.

या मार्गामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता. पनवेलमध्ये विविध मार्गांवर बांधण्यात आलेले भुयारी मार्ग अशापद्धतीने पाण्याखाली गेल्याने निकामी झाले आहेत. पावसात पाणी साचणे आणि त्यात डासांची उत्पत्ती होऊन आणखीनच नवी समस्या निर्माण होत आहे.

खारघर, कामोठे, नावडे, एमजीएम कामोठे व आता नव्याने तळोजा वसाहत येथे असे हे भुयारीमार्ग पाण्यांखाली गेले आहेत. खाडी क्षेत्रात मातीचा भराव घालून सिडको मंडळाने वसाहती वसविल्याने येथे भुयारी मार्गाचा पर्याय निकामी ठरण्याचा अनुभव गाठीशी असतानाही सिडको व रेल्वे प्रशासनाने तळोजा वसाहतीसमोरील हा भुयारी मार्ग बांधला.

हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने सध्या तळोजा वसाहतीमधील वाहनचालक पेणधर येथील दिवा-पनवेल लोहमार्ग ओलांडून येजा करीत आहेत.