उरण तालुक्यात चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील साठय़ात शुक्रवारी लक्षणीय वाढ दिसून आली. रानसई धरण ११६.५ फुटांपर्यंत भरले असून उरणकरांवर येऊ घातलेले पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.
उरण तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती तसेच औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी घटल्याने तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने दोन दिवसांची पाणीकपात लागू केली होती. मात्र मागील आठवडाभरात पडलेल्या मध्यम प्रमाणातील पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली. दहा दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले ११६ फुटी उंचीचे हे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गेल्या वर्षी हे धरण जुलैच्या अखेरीस भरले होते, यंदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरण्यासाठी सप्टेंबरच्या पंधरवडय़ापर्यंत वाट पहावी लागली. मात्र अद्याप यातील पाणी ओसंडून वाहून जाईल इतके भरले नसल्याचे एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी सांगितले.