गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतल्याची घोषणा होऊनही गुरूवारी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये काही किरकोळ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून आडत वसूल करण्याचा प्रयत्न केला. काल संप मागे घेतल्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यातील विविध भागातून शेतकरी मोठ्याप्रमाणावर शेतीमाल घेऊन वाशी येथे दाखल झाले होते. मात्र, येथील किरकोळ व्यापारांनी आडतीची मागणी करत अचानक संप पुकारला. शेतकऱ्यांनीही आडत देण्यास नकार दिल्याने तब्बल २०० ट्रक शेतीमाल वाशी मार्केटमध्ये तसाच पडून होता. दरम्यान, या वादावर काहीवेळापूर्वीच तात्पुरता तोडगा निघाला असून येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाणार नसल्याचे सांगत व्यापारांनी संप मागे घेतला आहे. आडतीच्या वादावर येत्या शनिवारी घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. त्यानंतर व्यापारांकडून पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. सुन्या सुन्या मंडईत माझ्या.. दरम्यान, काल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून आडत घेता येणार नाही अशी ठाम भूमिका घेत सरकारने कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संप फळे-भाजीपाला व्यापाऱ्यांनी मागे घेतला होता. त्यामुळे शेतकरी आज मोठ्या अपेक्षेने वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे बाजारातील शेतीमालाची आवकही मोठ्याप्रमाणावर वाढली. याचाच फायदा घेत काही व्यापारांनी शेतकऱ्यांकडून आडत वसूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, व्यापारी आणि अडत्यांनी शेतकऱ्यांची अशीच कोंडी करण्याचे प्रयत्न केले तर त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. भाज्यांचा ‘ऑनलाइन’ बाजार तेजीत! ..तर मनसेकडून शेतमाल विक्रीची व्यवस्था