घाऊक बाजारात घसरण, किरकोळ बाजारात ‘जैसे थे’; वाटाण्याची मोठय़ा प्रमाणात आवक गतवर्षी पडलेला समाधानकारक पाऊस आणि गुलाबी थंडी यामुळे मध्य प्रदेश व राजस्थानात मागील १० वर्षांत जेवढे उत्पादन झाले नाही, तेवढे हिरव्या वाटाण्याचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे केवळ २४ तासांत या दोन राज्यांतील हिरव्या वाटाण्याच्या तब्बल ८० गाडय़ा वाशी येथील भाजीच्या घाऊक बाजारात आल्या आहेत. त्याचा परिणाम इतर भाज्यांच्या भावावर झाला आहे. हिवाळ्यात ५० ते ६० ट्रक भरून हिरवा वाटाणा या भागातून येतो. किरकोळ व्यापारी मात्र घसरलेल्या भावांचा लाभ ग्राहकांना देत नसल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात भाव घसरले असले तरी किरकोळ बाजार जैसे थे आहे. किरकोळ विक्रेत्यांनी पडलेल्या भावांची संधी साधली आहे. यावर सरकारी अंकुश नसल्याने भाज्यांच्या भावात समानता नाही. मध्य प्रदेशातील इंदौर व राजस्थानातील जयपूर येथून वाशीच्या घाऊक भाजी बाजारात दररोज ८० ट्रक हिरवा वाटाणा विक्रीस येतो. हिरव्या वाटाण्याची आवक वाढल्यानंतर भाजी बाजारात मंदी येत असल्याचा व्यापाऱ्यांचा जुना अनुभव आहे. राज्यातील भाज्यांना उठाव नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील वसूल होणे कठीण झाले आहे. परिणामी व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकाराने खरेदीदाराकडून दलाली घेण्याचे आदेश दिल्याने कमी दरामुळे व्यापाऱ्यांच्या हाती काही पडेनासे झाले आहे. वाटाण्यामुळे बाजाराचे गणित कोलमडले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून मोठय़ा प्रमाणात हिरव्या वाटाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे इतर प्रमुख भाज्यांचे भाव आणखी कमी झाले आहेत. यात शेतकरी आणि व्यापारी दोघेही भरडले जात आहेत. पुढील महिन्यापर्यंत ही मंदी राहणार आहे, मात्र या मंदीचा फायदा ग्राहकांना होताना दिसून येत नाही. - शंकर पिंगळे, भाजी व्यापारी, एपीएमसी मार्केट, तुर्भे (वाशी)