पूनम धनावडे

रेल्वे मार्गालगत शेती; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

नवी मुंबई शहरातील रेल्वे मार्गालगत विविध ठिकाणी पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र धक्कादायक म्हणजे या भाज्या स्वच्छ पाण्यावर न पिकविता नाल्यातून येणाऱ्या दूषित सांडपाण्यावर पिकविल्या जात आहेत. या भाज्या आरोग्यास हानीकारक असल्याचे आहारतज्ज्ञाचे मत आहे.

विविध रेल्वे स्थानकांलगत पालेभाज्या पिकविल्या जातात. वाशी सेक्टर २६ समोरील रेल्वे वसाहतीजवळ वाशी ते ठाणे रेल्वे मार्गालगत जवळपास तीन ते चार एकर जमिनीवर भाजी पिकवण्याचा व्यवसाय सुरू आहे. जुईनगर रेल्वे स्थानकालगतही अशा प्रकारे भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. कोपरखैरणे ते तुर्भे या मार्गालगत मोठय़ा प्रमाणात भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मात्र या भाज्या पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी मात्र निकृष्ट दर्जाचे असून दूषित सांडपाण्यावर भाज्यांची पैदास केली जात आहे. या रेल्वे मार्गालगतच महापे औद्योगिकक्षेत्रातील अनेक कंपन्यांमधून नाल्यावाटे सांडपाणी सोडले जाते. भाजीची पिके घेणारे डिझेल पंपाद्वारे नाल्यातील पाणी उचलले जाते. अशाप्रकारे दूषित पाण्यावर पोसलेली भाजी नागरिकांच्या माथी मारली जाते.

जमीन निकृष्ट 

कोणतेही पीक घेण्यासाठी जमीन सुपीक असावी लागते. रेल्वेलगतची जागा फारशी चांगल्या दर्जाची नाही. त्यातून पीक घेण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. भाज्यांच्या गुणवत्तेवर त्याचा दुष्परिणाम होतो.

दररोज ८०० किलो

याठिकाणी दररोज पालक, मेथी, मुळा या पालेभाज्यांचे ७०० ते ८०० किलो उत्पादन घेतले जाते. बाजारात स्वस्तात व ताजी भाजीच्या नावाने विक्री केली जाते.

रसायनमिश्रित दूषित सांडपाण्यावर पिकविलेल्या भाज्या या मानवी शरीराला घातक आहेत. रसायनयुक्त पदार्थ पचविण्याची ताकद शरीरात नाही. त्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कर्करोगही होऊ शकतो.

– प्रतीक्षा कदम, मुख्य आहारतज्ज्ञ, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर, नेरुळ