रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर नव्याने मर्यादा आणल्या गेल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. यापुढे वेगमर्यादेपेक्षा सुसाट वाहने चालवल्यास नवी मुंबई वाहतूक विभागाकडे आलेल्या अत्याधुनिक वाहनांपासून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर या दंडाबाबतचे थेट चलान वाहनचालकाला घरपोच मिळणार आहे.

राज्यभरात द्रुतगती मार्गासह चार मार्गिका रस्ते आणि महापालिका हद्दीतील रस्त्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत अशा दोन अत्याधुनिक वाहनांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते या वाहनांचे उद््घाटन करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या दोन वाहनांवर तीन वाहतूक कर्मचारी आणि एक अधिकारी असेल. ही वाहने शीव-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर महामार्ग, तसेच पामबीच मार्गावर गस्त घालणार आहेत.

वेगाने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ऑनलाइन नोटीस दिली जाणार आहे, तसेच प्रत्यक्षात जागेवरही कारवाई केली जाणार आहे. याच अत्याधुनिक वाहनांमध्ये स्पीड गन, ब्रेथ अ‍ॅनालायजर, टिंट मीटर या उपकरणांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक विभागाच्या कारवाईला इंटरसेप्टर या दोन नव्या अत्याधुनिक वाहनांची मदत होणार आहे. सध्या घडणाऱ्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी इंटरसेप्टरच्या साहाय्याने वेगवान गाडय़ांचा वेध घेण्याचे ठरवले आहे.

२५८ जणांचा बळी

नवी मुंबई शहरात गतवर्षी अपघातात २५८ जणांना जीव गमवावा लागला होता. यातील मुख्यत्वे अपघात वाहनांचा अतिवेग, मद्यपान करून वाहन चालवणे या प्रकारामुळे अधिक अपघात झाले आहेत.

शहरासाठी दोन अत्याधुनिक वाहने प्राप्त झाली असून आजपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. दोन्ही परिमंडल क्षेत्रांत या अत्याधुनिक वाहनांमधील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

– सुनील लोखंडे, उपायुक्त नवी मुंबई वाहतूक विभाग