तामिळनाडूतील आपत्तीचा हापूसवर परिणाम यंदा उशिरा आगमन अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याला या वर्षी तामिळनाडू येथील बदलत्या हवामानाचा फटका बसला असून यंदा हापूस उशिरा दाखल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कोकणात ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या अति उष्णतेमुळे झाडांना नव्याने पालवी फुटल्याने हापूसचे उत्पादन आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. यामुळे मेनंतर बाजारात मोठय़ा प्रमाणात हापूस येतील असे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी सचिव पातळीवर समिती स्थापन करून आंबा बागायतदारांना पीक विमासारखी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यात कोणतीच प्रगती न झाल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांचे हाल पूर्वीसारखेच कायम आहेत. गेल्या वर्षी हापूस आंब्याचे उत्पन्न चांगले झाले असताना अवकाळी पावसाने या चांगल्या उत्पन्नावर पाणी फेरले. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीची आर्थिक पोकळी भरून निघेल या अपेक्षेत असलेल्या बागायतदारांना तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या आठवडय़ात झालेल्या वादळ आणि अतिपावसाचा फटका बसला आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात येणारे उत्पादन दीड ते दोन महिने उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंबा बागायतदारांमध्ये मागील काही वर्षांपासून सुरू झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे कल्टरचा वापर करून काही बागायतदार जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात हापूस आंबा बाजारात पाठविण्याचा प्रयत्न करीत असतात. दोन महिन्यापूर्वी हापूस आंब्याची मुंबईच्या बाजारात आलेली पेटी हा एक अपवाद मानला जात आहे. यंदा मोहरच उशिरा येत असल्याने कल्टरचा वापर करून बाजार काबीज करणाऱ्यांनाही एप्रिलशिवाय हापूस आंबा हाती लागणार नाही असे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यात अपवाद म्हणून येणाऱ्या पेटय़ा २०० ते ३००पेक्षा अधिक नसतील. फळधारणा उशिरा होणार असल्याने टप्प्याटप्प्याने येणारा हापूस त्यानंतर मात्र बाजारात एकदम येण्याची शक्यता आहे. संजय पानसरे, आंबा व्यापारी ऑक्टोबरमध्ये वाढलेली उष्णता आणि त्यामुळे पडणारा पाऊस याचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पन्नावर या वर्षी झालेला दिसून येत आहे. यंदा मोहर उशिरा आल्याने पीक उशिरा येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर हिटमुळे ९० टक्के हापूस आंबा झाडांची पालवी जळून खाक झाली होती. त्या ठिकाणी आता नवीन पालवी येत आहे. प्रसन्ना पेठे, हापूस आंबा बागायतदार