जाळ्यांना बंदिस्त करण्याची गरज; आवारात नागरिकांचा सहज वावर

जलसाठय़ांमध्ये विषारी रसायने मिसळून घातपाताचा कट नुकताच उघडकीस आला आहे. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पारसिक हिलवरील जलकुंभही असुरक्षित असल्याचे ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या ठिकाणी जाळ्यांचे कुंपण आहे. परंतु ते पत्र्याचे बंदिस्त करणे गरजेचे आहे.

मुंब्रा व औरंगाबादहून ‘आयरिस’ समर्थकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीत राज्यातील जलसाठय़ांमध्ये विषारी रसायने मिसळून घातपाताचा कट उघड झाला आहे. नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जाता. पारसिक हिल येथे सर्वात मोठा जलकुंभ आहे. यातून सध्या नवी मुंबई शहरात प्रतिदिन ३७५ एमएलडी पाणी दिले जात आहे.

केंद्राच्या ‘जेएनएनआरयूएम’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठय़ासाठी २३० कोटी रुपये खर्चून पालिकेने पाणीपुरवठा व्यवस्था उभारली आहे. मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्याचे वितरण करण्यासाठी शहरातील उंचावर असणाऱ्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या पारसिक हिलवर मोठा जलकुंभ बांधण्यात आला आहे. आग्रोळी गावाजवळ असलेल्या पंपहाऊसद्वारे हे पाणी पारसिक हिल येथील जलकुंभामध्ये जाते. तेथून शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षाही महत्त्वाची आहे. मात्र सुरक्षाव्यवस्था आहे, पण गांभीर्य नसल्याचे दिसून आले. या जलकुंभालगत पालिकेचे उद्यान असून सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो. जलकुंभाभोवती लोखंडी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या जाळ्यातून घातपात करणे शक्य आहे.  या ठिकाणी इनलेट चेंबर व व्हेंटिलेशन चेंबर येथे जाण्यास मनाई आहे, असा फलक लावण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी सातत्याने नागरिक जात असतात. सुरक्षा व्यवस्थाही ठेवली आहे. परंतु जलकुंभाच्या जाळ्या बंदिस्त करण्याची गरज आहे. पाणीपुरवठय़ासाठी कोटय़वधींचा खर्च केला जातो. त्यामुळे येथील कडक सुरक्षेसाठी पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पारसिक हिलवरील जलकुंभावर सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्यान असल्याने नागरीकांना प्रवेश दिला जातो. परंतू येथील जलकुंभांभोवती  बंदीस्त उपाययोजना तत्काळ करण्यात येतील.     – मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग