ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे पुलाजवळ एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्र पाडून पाणीचोरी करण्याच्या घटना घडत आहेत. एका हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.ठाणे बेलापूर मार्गावरील कोपरखरणेकडे जाणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला लागून झोपडपट्टी वसण्यात आली होती. या झोपडय़ांवर वारंवार कारवाई केल्यानंतर अखेर या झोपडय़ा हटवण्यात आल्या. या ठिकाणी पुन्हा झोपडय़ा उभारल्या जाऊ नयेत यासाठी एमआयडीसीच्या वतीने या ठिकाणी बांधकाम करण्यात येत असून पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. पण या बांधण्यात येणाऱ्या बांधकामाला सर्रासपणे एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्र पाडून पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे. एमआयडसीचे उपअभियंता अविनाश माळी यांच्याशी संपर्क साधला असता हा विभाग ए.व्ही. आव्हाड यांच्या विभागात येत असल्याचे सांगितले. एमआयडीसीचे उपअंभियता ए. व्ही. आव्हाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.