नवी मुंबई : धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने, सिडकोने सिडको अधिकारक्षेत्रातील नोड आणि गावांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असून २७ जूनपासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोतर्फे सिडको अधिकारक्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणीपुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु उपरोक्त धरण क्षेत्रांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणी साठ्यात पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिडकोने नागिरकांना पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन केले असून २७ जूनपासून २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.