मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात राज्यातून भाज्यांची आवाक होते. परंतु सध्या पावसाने भिजलेल्या भाज्या बाजारात दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात ६०% पालेभाज्या खराब होत असून केवळ ४०% भाजी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परिणामी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी बाजारात कोथिंबीरच्या जुडीने ८० रुपये तर मेथीने चाळीशी गाठली आहे. पुढील कालावधीत ही पालेभाज्यांचे दर चढेच राहणार असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- कांदा रडवणार? दिवाळीनंतर कांदा महागण्याची शक्यता

पावसामुळे कोथिंबीर, मेथी आणि पालक खराब

एपीएमसी भाजीपाला बाजारात सोमवारी ६४७ भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये कोथिंबीर आणि पालक यांची १ लाख क्विंटलहुन अधिक आवक होत आहे. मात्र कोथिंबीर, मेथी आणि पालक ही मोठ्या प्रमाणावर सडत आहे. नाशिक ते मुंबई बाजारात येईपर्यंत भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या पालेभाज्यांमध्ये ६०% पालेभाजी खराब झाली होती. त्यामुळे बाजारात कोथींबीरने उच्चांक गाठला आहे. एपीएमसीत कोथिंबीरच्या ४३ गाड्या, मेथीच्या ७ तर पालकच्या ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. शनिवारी बाजारात ८४ हजार ४०० क्विंटल तर आज सोमवारी १ लाख ५०हजार १०० क्विंटल कोथिंबीर आवक झाली आहे. शनिवारी घाऊक बाजारात नाशिकची जुडी ४०-५०रुपयांनी उपलब्ध होती ती आज सोमवारी ५०-८० रुपयांवर गेली आहे. मेथी १८-२४ रुपये दर होता ते आज ३०- ४० रुपयांनी उपलब्ध आहे. पाऊस असाच सुरू राहीला तर पुढील १५ ते २० दिवस पालेभाज्यांचे दर चढेच राहतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिका कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवणार; ओला- सुका कचऱ्यासह घरगुती घातक कऱ्याचेही होणार वर्गीकरण

६०% भाज्या खराब

सोमवारी बाजारात शनिवारपेक्षा पालेभाजी आवक वाढली होती. परंतु पावसाने भिजलेल्या भाज्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ६०% भाज्या खराब झाल्या आहेत तर ४०% भाज्या चांगल्या आहेत. पुढील पंधरा दिवस भाज्यांचे दर चढेच राहतील, अशी माहिती घाऊक व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी दिली