उरण : उरण तालुक्यातील महावितरणच्या वीजचोरीच्या घटनांत वाढ झाली असून ऑगस्टपासून तालुक्यातील वीजचोरी करणाऱ्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत २१६ प्रकरणात ४ लाख २३ हजार ८८७ युनिटची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे महावितरणला ८० लाख ५० हजारांचा तोटा झाला होता. त्यातील कारवाईनंतर आतापर्यंत ६० लाख ४४ हजार रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उरणमधील महावितरण कंपनीकडून नागरिकांना विजेचा पुरवठा केला जात आहे. हा वीजपुरवठा केला जात असताना त्याची चोरी केली जात आहे. त्यामुळे नियमित व प्रामाणिकपणे वीजबिले भरणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक भरुदड सहन करावा लागत आहे. तसेच महावितरण कंपनीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरण विभागाकडून मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महावितरणकडून केल्या जाणाऱ्या विजेचा योग्य वापर करून महावितरणला सहकार्य करून चोरीचे प्रकार थांबविण्याचे आवाहन उरणमधील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनावणे यांनी ग्राहकांना केले आहे.