सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील उरण तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मात्र सोमवारी उशीरा सिडको व प्रशासनाच्या बैठकीत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी नुकसानभरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : दिघोडेत जलवाहिनी फुटून नुकसान; दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा आंदोलनाचा पवित्रा

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीला १७ डिसेंबर २०२० ला मोठी गळती लागली होती. परिणामी दिघोडे, वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या घर तसेच अनेक वस्तू आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यांना दोन वर्षांपासून नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात आले आहे. या विरोधात सोमवारपासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. हेटवणे जलवाहिनी नूकसानग्रस्त रहिवाशांना दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी ही भरपाई मिळालेली नाही.
नूकसानग्रस्त रहिवाशांच्या घरांचे, व्यवसायिकांच्या दुकानाचे पंचनामे हे महसूल विभागाचे अधिकारी आणि दिघोडे ग्रामपंचायतीने तातडीने केले होते. तशा प्रकारचा अहवाल सिडकोकडे सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट….

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची उपोषणस्थळी भेट

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी मनीष पाटील यांच्या उपोषणाला भेट दिली यावेळी त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.