उरण येथील द्रोणागिरी मधील भेंडखळच्या केंद्रीय भांडरण विभाग(सी. डब्ल्यू. सी.) गोदामात पोलारीस लॉजिस्टिक कडून १५ वर्षांपासून काम करणाऱ्या ५०२ स्थानिक भूमिपुत्र कामगारांना नोकरी नाकारली जात असल्याने सोमवार पासून कामगार व ग्रामस्थांनी टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केलं आहे. या कामगारांना विविध संघटना आणि राजकीय पक्ष नेत्यांनी पाठींबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत पाटील,जेएनपीटी चे माजी विश्वस्त कॉ.भूषण पाटील तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. हेही वाचा- नवी मुंबई : दारू पिऊन धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित पंधरा वर्षापपूर्वी द्रोणागिरी नोड मधील भेंडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत हिंद टर्मिनल हे गोदाम उभारण्यात आले होते. या गोदामात भेंडखळ गावातील बेरोजगार तरुणांना स्थानिक भूमिपुत्र म्हणून १५ वर्षांपूर्वी नोकरी देण्यात आली होती. मात्र हिंद टर्मिनल आणि सी. डब्ल्यू. सी. यांच्यातील भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या टर्मिनल मधील काम बंद झाले आहे. परिणामी भेंडखळ मधील स्थानिक कामगार बेरोजगार झाले आहेत. हे गोदाम सुरू करून बेरोजगारांना काम द्या या मागणीसाठी कामगारांनी २०१९ मध्ये आंदोलन केले होते. तर गोदाम सूरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे सी. डब्ल्यू.सी. ने निविदा काढली होती. ही निविदा पोलारीस या कंपनीला मिळाले आहे. मात्र या कंपनी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नकारत असल्याचं कामगार आणि ग्रामस्थांच म्हणणं आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराने १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कामांवर घ्यावे या मागणीसाठी हे साखळी उपोषण सुरू केले आहे. हेही वाचा- नवी मुंबई : अधिक उत्पादन, उठाव कमी असल्याने कांद्याच्या दरात घसरण या गोदामातील कामगारांचे नेतृत्व करीत असल्याने सी. डब्ल्यू. सी. ने पुन्हा गोदाम सुरू करावे यासाठी आपण प्रयत्न केल्याची माहीती कामगार नेते भूषण पाटील यांनी दिली. तर जो पर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना गोदामातील नोकरीत सामावून घेतले जात नाही. तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे कामगारांना स्पष्ट केले आहे.